Tuesday, 21 December 2021

मुंबई पुन्हा जिंकली

सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार!!!

सेकंडरी स्कूल्स एम्पलॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. कुर्ला मुंबई या पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल काल लागला.सहकार पॅनलला अपेक्षित यश मिळवता आले नाही.विविध संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या सहकार पॅनलला मुंबईत सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने भरघोस मतदान झाले. परंतु ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत सहकार पॅनलला आपला निर्धारनामा पोहोचवता आलेला नाही. मुंबईतील बोरीवली, जोगेश्वरी, दादर,कुर्ला, विक्रोळी, चेंबूर विभागात मतदारांचा कौल सहकार पॅनलच्या बाजूने राहिला. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, ठाणे सानपाडा शाखेतील आणि बाहेरच्या इंदापूर, नारायणगाव,माणगाव शाखेत सहकार पॅनलला चांगले मतदान केले. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कराड, सोलापूर, पंढरपूर, पिंपरी चिंचवड ,पुणे, लोणावळा इत्यादी शाखांमध्ये विरोधकांना जवळपास सहा हजाराचे मताधिक्‍य मिळाले. मुंबईत झालेल्या 8000 मतदानापैकी जवळपास साडेपाच हजार मते सहकार पॅनलला मिळाली.परंतु ग्रामीण भागातील मताधिक्य पार करून विजय मिळवण्या इतपत मते मिळालेली नाहीत. सहकार पॅनल हा पराभव स्वीकारत असून विजयी झालेल्या संचालकांना पारदर्शी व स्वच्छ कारभार करण्यासाठी शुभेच्छा देत आहे. सहकार पॅनलच्या माध्यमातून सभासदांच्या हिताचा जाहीर केलेला निर्धारनामा पूर्ण करण्याची जबाबदारी विजयी संचालकांनी घ्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करत आहे.

मुंबईत समता पॅनलला काही संघटनांच्या नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. विविध शाळातील काही गट समता पॅनलच्या सोबत असल्याचे चित्र समोर आले. या सर्व नेत्यांना आणि समता पॅनलच्या हितचिंतकांना सेकंडरी पतपेढीचा कारभार सभासदांच्या हितासाठी आणि पतपेढीच्या विकासासाठी करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यातील सभासदांची अर्थवाहिनी असलेली ही सेकंडरी पतपेढी सभासदांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबवून चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करेल अशी मी आशा बाळगतो.

सेकंडरी पतपेढीच्या निवडणुकीत शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी,सदस्यांनी आणि आम्हा सर्व उमेदवारांच्या हितचिंतकांनी जिवाचे रान केले. रात्रीचा दिवस केला. कशाचीही अपेक्षा न करता स्वतःचा वेळ खर्च करून,पदरमोड करून जी मेहनत केली त्यामुळेच सहकार पँनलला भरघोस मते मिळाली. या माझ्या सर्व बंधू-भगिनींना मी त्रिवार अभिवादन करतो.

पाकीटे घेऊन, कसलीतरी आश्वासने घेऊन काम करणारे अनेक जण आपल्याला भेटतात, दिसतात पण निस्वार्थपणे आपले सहकारी निवडून यावेत म्हणून लढणारे, झटणारे कार्यकर्ते आम्हाला मिळाले हीच आमची आयुष्यभराची कमाई आहे. रात्री निकालाला उशीर होत होता. अनेकांना आपण घरी जावे अशी मी विनंती केली. पण आपण आम्हाला सोडून जायला तयार नव्हतात. सहकार पॅनलच्या पराभवाच्या दुःखापेक्षा माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून मला तीव्र वेदना झाल्या.आपण त्यांची इच्छा पूर्ण न करू शकल्याचे शल्य कायम टोचत राहणार आहे. मी आपल्या सर्वांचे आभार मानणार नाही तर आयुष्यभर आपल्या ऋणात राहण्याचा प्रयत्न करेन. संघटनेच्या माध्यमातून अथवा वैयक्तिकरीत्या आपल्या सर्वांना कधीही गरज असल्यास एक आवाज द्या आम्ही सर्वजण आपल्या सोबत राहू. माझ्या आयुष्यात आपल्या सर्वांचे स्थान काय आहे हे मी शब्दात सांगू शकणार नाही पण नेहमी आपल्या सहकार्यासमोर नतमस्तक राहण्याचा मी प्रयत्न करेन. तुमची जिद्द, चिकाटी आणि लढण्याची हिम्मत मला भविष्यातील अनेक संघर्षासाठी सातत्याने प्रेरणादायी ठरेल.

आपल्या सर्वांना सलाम!

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती,
महाराष्ट्र राज्य



Wednesday, 24 November 2021

अखेर १२ व २४ वर्षे वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी प्रक्रिया जाहीर


शिक्षक भारतीचा यशस्वी पाठपुरावा

मात्र प्रशिक्षणाच्या शुल्काला शिक्षक भारतीचा विरोध

१२ वर्षे / २४ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांसाठी वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाबाबत परिपत्रक जारी झाले आहे. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने सातत्याने याबाबत बैठका केल्या होत्या. पाठपुरावा केला होता. शिक्षण आयुक्त यांनी यासंदर्भात २० सप्टेंबर २०२१ रोजीच्या बैठकीत लवकरच याबाबत १० दिवसांचं ऑनलाईन ट्रेनिंग घेण्यात येणार आहे, असं सांगितलं होतं. २ ऑक्टोबर रोजी हे ट्रेनिंग जाहीर करण्यात येणार होतं. परंतु ते झालं नाही. त्यानंतर कपिल पाटील आणि शिक्षक भारती सातत्याने याचा पाठपुरावा करत होती. आज अखेर या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याबाबतचे पत्रक निघाले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सविस्तर माहितीसाठी यासंदर्भातला जुना ब्लॉग जरूर वाचा
Tap to read - https://subhashkisanmore.blogspot.com/2020/08/blog-post_24.html?m=1


शिक्षक भारतीचा प्रशिक्षण शुल्काला विरोध

पहिल्यांदा अशाप्रकारच्या प्रशिक्षणासाठी रु. २,०००/- शुल्क आकारण्यात आले आहे. याचा शिक्षक भारती निषेध करते. प्रशिक्षण देणं ही खरं तर सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे शुल्काची ही जाचक अट रद्द करण्याबाबत शिक्षक भारती आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहे.

प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

१) प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.

२) दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३) दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्ष सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

४) प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२१ पर्यंत सुरू राहील.

५) सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतरच पुढील सूचना संबंधितांना ईमेलद्वारे देण्यात येतील.

६) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत -
गट क्र. १ - प्राथमिक गट,
गट क्र. २ - माध्यमिक गट,
गट क्र. ३ - उच्च माध्यमिक गट,
गट क्र. ४ - अध्यापक विद्यालय गट.

७) प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८) नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.

९) प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असतानाच नोंदविलेल्या ईमेल आयडीवर पाठविण्यात येतील.

१०) नोंदणी फार्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास 'माहितीत बदल करा' या बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.

११) प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१२) या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक प्राधिकरण, मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१३) आणि १४)
प्रशिक्षण शुल्काबाबत शिक्षक भारतीने विरोध केलेला आहे. हे शुल्क रद्द करण्यासाठी शिक्षक भारती तातडीने पाठपुरावा करत आहे.

१५) नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेलवरून trainingsupport@maa.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा.

१६) वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणून संबंधित शिक्षक वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील नमूद अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

१७) नोंदणी केलेल्या शिक्षकांचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

१८) शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय . जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

१९) सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

वरील कोणत्याही मुद्द्यांबाबत किंवा प्रशिक्षणाबाबत कोणतीही अडचण आल्यास शिक्षक भारती सदैव आपल्या सर्वांच्या सोबत आहेच.

प्रशिक्षण नोंदणीसाठी दिलेल्या अर्जात असलेल्या त्रुटींबाबत

१) या प्रशिक्षणासाठी नोंदणी करत असताना शालार्थ आयडी असणं आवश्यक आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेतील शिक्षकांचे पगार SAP प्रणाली द्वारे होतात. त्यामुळे त्यांच्याकडे शालार्थ आयडी नाही. याबाबत मुंबई महानगरपालिकेने तात्काळ शालार्थ आयडी द्यावा अशी आयुक्तांकडून सूचना जाणे आवश्यक आहे. अथवा शालार्थ आयडीची नोंद करण्याची अट शिथिल करण्याची आवश्यकता आहे.

२) या प्रशिक्षणासाठी विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना नोंदणी करता येणार नाही. कारण त्यांच्याकडे सुद्धा शालार्थ आयडी नाहीये. त्यामुळे शिक्षक भारतीच्यावतीने शालार्थ आयडीची नोंद वगळण्यात यावी अशी मागणी केली जाणार आहे.

३) १२ वर्षे, २४ वर्षे प्रशिक्षणासाठी नोंद करत असताना शिक्षण सेवक (सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन) कालावधी ग्राह्य धरला जात नव्हता. मूळ नियुक्ती दिनांक ग्राह्य न धरल्यामुळे ३ वर्षे नुकसान होतं. याबाबत शासनाने शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरावा असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु ते झालेलं नाही. शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरण्याबाबत दुरुस्ती होणे आवश्यक आहे. 

४) नोंदणी करत असताना व्यावसायिक अर्हता निवडताना जो गट दिलेला आहे त्याच्यामध्ये संगीत शिक्षकांच्याबाबत कोणत्याही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सर्व संगीत शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबतही तात्काळ खुलासा होणे आवश्यक आहे.

इतर काही मुद्दे सूचना असल्यास कमेंटमध्ये कळवावे.

यासर्व त्रुटी दूर होण्याबाबत आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक भारती पाठपुरावा करणार आहे.
तसेच
प्रशिक्षण शुल्काची जाचक अटही नक्कीच रद्द होईल.
लढूया, जिंकूया!

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र


Friday, 24 September 2021

मुंबईतील आर्च बिशप संचलित शाळांमधील 2001 नंतर नियुक्त शिक्षकांना दिलासा



मुंबईतील आर्च बिशप संचलित शाळांमधील 2001 नंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल अशाप्रकारचे पत्रक जारी करण्यात आले होते. 15 ते 20 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षा दयावी लागणार या बातमीने सर्व शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातील अनेक शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. टीईटी परीक्षा ऊत्तीर्ण न झाल्यास आपली नोकरी धोक्यात येणार का? असे प्रश्न उपस्थित झाले. शिक्षक भारतीकडे आलेल्या तक्रारीनुसार आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण आयुक्त श्री. विशाल सोळंकी यांच्यासोबत दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी या विषयावर सविस्तर बैठक घेतली. या बैठकीस शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, खजिनदार विलास परेरा, एबीईचे सचिव फादर डेनिस, फादर केणी, मुख्याध्यापिका डॉमिनिका डाबरे मॅडम, रात्र शाळा मुख्याध्यापक संघाचे चंद्रकांत म्हात्रे, कैलास गुंजाळ सर उपस्थित होते.

शिक्षण आयुक्तांच्या सोबत झालेल्या बैठकीतील निर्णय

  • 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नाही. अशा प्रकारचा खुलासा शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे. 
  • 13 फेब्रुवारी 2013 नंतर पहिली ते पाचवी आणि पाचवी ते आठवी गटात नियुक्त शिक्षकांना टीईटी पास होणे बंधनकारक आहे. 
  • ज्या शिक्षकांची नियुक्ती नववी ते दहावी गटात झालेली आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे नाही.

टीईटी परीक्षेबाबत कोणताही संभ्रम असल्यास अथवा माहिती हवी असल्यास शिक्षक भारती कार्यालयाशी व पदाधिकार्‍यांशी संपर्क करावा.



एबीई शाळांतील नियुक्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणार मान्यता

28 जानेवारी 2019 ते 4 मे 2020 दरम्यान शाळेत लिपिक लॅब असिस्टंट व ग्रंथपाल पदावर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता देण्याचा निर्णय आज आयुक्तांच्या बैठकीत झाला. 28 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत, पूर्णतः अनुदानित, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतिबंध लागू करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील एबीई संचलित शाळांमध्ये विहित प्रक्रियेचा अवलंब करून लिपिक,लॅब असिस्टंट व ग्रंथपाल पदावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाकडून पद वाटपाची कार्यवाही उशिरा झाल्याने या नियुक्त कर्मचाऱ्यांना मान्यता देण्यास शिक्षण विभागाने नकार दिला आहे. त्याचा शिक्षक भारतीने आजच्या बैठकीत निषेध केला. या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या विहित पद्धतीने झालेल्या असून शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा फटका या कर्मचाऱ्यांना बसता कामा नये, अशी बाजू मांडली. तसेच या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना मान्यता देण्यास विलंब झाला तर अनेक कर्मचारी ऐज बार होण्याची शक्यता आहे. म्हणून या सर्व नियुक्तयांना मान्यता द्यावी अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली. त्यानुसार शिक्षण आयुक्त सोळंकी यांनी 28 जानेवारी 2019 ते 4 मे 2020 दरम्यानच्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती प्रस्ताव सादर करण्याबाबत सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. एबीईचे सचिव फादर डेनिस यांनी तसा प्रस्ताव आमदार कपिल पाटील यांच्याकडे देण्याचे मान्य केले आहे. यावेळी अनेक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मिटिंगनंतर आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे आभार मानले.   

शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या नियुक्ती संदर्भात सर्व माहिती तात्काळ शिक्षक भारती कार्यालयात जमा करावी.   


आपला स्नेहाकिंत
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य



Tuesday, 21 September 2021

शिक्षण आयुक्तांसोबतची आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीची बैठक यशस्वी


दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी जवाहर बाल भवन, चर्नी रोड, मुंबई येथे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासोबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पदाधिकारी बैठक झाली.

आयुक्तांच्या बैठकीबाबत शिक्षण उपसंचालक यांचे पत्र. 

बैठकीसाठी आमदार कपिल पाटील यांनी आयुक्त यांना दिलेलं पत्र 

1 नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत

आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार आणि शिक्षणमंत्री मा. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत तर चर्चा केली होती. सर्व कर्मचाऱ्यांची एकूण संख्या निश्चित करावी. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास लागणाऱ्या आर्थिक भाराची सविस्तर माहिती घेऊन प्रस्ताव तयार करण्यात यावा असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आणण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

(या संदर्भातला 17 जून 2021 चा सविस्तर ब्लॉग जरूर वाचा. Tap to read  - http://subhashkisanmore.blogspot.com/2021/06/blog-post_17.html)

त्यानुसार शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी बैठकीत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची एकूण राज्यातील संख्या 26 हजार 550 असून आर्थिक भाराची माहिती घेण्याचे काम सुरू आहे असे सांगितले. राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची सविस्तर अचूक माहिती येत नसल्याने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोठा आर्थिक भार पडेल अशा प्रकारचे वक्तव्य वित्त विभागाकडून वारंवार होत होते. म्हणून आमदार कपिल पाटील दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षण संचालकांना पत्र देऊन निश्चित संख्या विचारली होती. त्या अनुषंगाने राज्यभरातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अदययावत  माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीच्या आधारे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करणे सोपे जाणार आहे.

शिक्षण विभागाकडे आलेल्या माहितीनुसार आज रोजी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित किंवा तुकडीवर कार्यरत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 26550 निश्चित करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचाऱ्यांची पीएफ कपात नियमितपणे होत आहे. शासनाने सगळ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला तर शासनावर पडणारा आर्थिक भार अत्यल्प आहे असे मत आमदार कपिल पाटील यांनी मांडले. या 26 हजार 550 कर्मचाऱ्यांना डीसीपीएस अथवा एनपीएस मध्ये वर्ग केल्यास त्यांचे पीएफ कटिंग बंद होणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दरमहा दहा टक्के रक्कम एनपीएस मध्ये कपात करून द्यावी लागेल. या रकमेत शासनाला शासन हिस्सा म्हणून 14 टक्के रक्कम कपात करावी लागणार आहे. 26550 कर्मचाऱ्यांना 14 टक्के शासन हिस्सा दिल्याने पडणारा आर्थिक भार हा जुनी पेन्शन योजना लागू केल्यास पडणाऱ्या आर्थिक भारापेक्षा जास्त होऊ शकतो. शासनाने अनुदान सूत्र पाळून वेळीच अनुदान न दिल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष विनावेतन काम करावे लागले आहे. निदान निवृत्तीच्या वेळी तरी जुनी पेन्शन योजना लावून या सर्व शिक्षकांचा सन्मान शासनाने केला पाहिजे अशी भूमिका शिक्षक भारतीने मांडली.

12 वर्षे व 24 वर्षे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण 

राज्यभरात 12 वर्ष 24 वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी यांचे प्रशिक्षण होत नसल्याने हजारो शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणांमुळे अनेक शिक्षक काही लाभ न घेता निवृत्त झाले किंवा मृत पावले आहेत. वेतनश्रेणीचे प्रशिक्षण ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार आणि नक्की कधी होणार याबाबत  संभ्रम पसरलेला आहे. आज शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ऑक्टोबर महिन्यात ऑनलाईन प्रशिक्षण घेण्याचे जाहीर केले. हे ऑनलाईन प्रशिक्षण दहा दिवसांचे असून प्रशिक्षणाची उद्दिष्टे, विषय निश्चिती, घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, अभ्यासक्रमानुसार ऑनलाइन मॉडेल तयार करणे, रेकॉर्डिंग करणे कामे अंतिम टप्प्यात असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ट्रेनिंग जाहीर करण्यात येणार आहे असे सांगितले.

(या संदर्भातला 24 ऑगस्ट 2020 चा सविस्तर ब्लॉग जरूर वाचा. Tap to read  - http://subhashkisanmore.blogspot.com/2020/08/blog-post_24.html)

बैठकीत शिक्षण आयुक्तांनी खालील विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले.

1) बीडीएस संगणक प्रणाली बंद असल्यामुळे हजारो शिक्षकांना वैद्यकीय बिले, थकीत बिले तसेच स्वतःच्या हक्काचे पीएफचे पैसे मिळत नाहीत. तात्काळ बीडिएस प्रणाली सुरू झाली पाहिजे अशी मागणी शिक्षक भारतीने केली.माननीय शिक्षण आयुक्तांनी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व बिलांची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

2) मुंबईसह राज्यातील शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया विलंबाने होत असल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. मुंबईतील उपसंचालक कार्यालयात 500 पेक्षा अधिक प्रस्ताव प्रलंबित असल्याचे शिक्षक भारतीने सांगितले.  त्यावेळी शिक्षण उपसंचालक श्री संगवे यांनी 400 शालांर्थ आयडि देण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसात उर्वरित 100 शालार्थ आयडीचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले. तसेच शालार्थ आयडीसाठी शिक्षण विभागातील कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे देऊ नये असे आवाहन आमदार कपिल पाटील यांनी केले.

3) कोविड ड्युटी करताना कोविडची लागण झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष रजा देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे आश्वासन दिले.

4) सुट्टीच्या कालावधीत बीएलओ ड्युटी करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना बदली रजा देऊन त्यांची नोंद सेवा पुस्तकात करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

सोबत प्राथमिक शिक्षकांच्या वस्तीशाळा शिक्षकांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा, प्राथमिक पदवीधर / विषय शिक्षकांना सरसकट ४३०० ग्रेड पे वेतन, आंतर जिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदली,  कोविड ड्युटी केलेल्या कर्मचारी यांना विशेष रजा, मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना १० लाख सानुग्रह अनुदान यासह विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. 






शिक्षण आयुक्त सोबतच्या बैठकीत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे,  प्राथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके, खजिनदार विलास परेरा, चंद्रकांत म्हात्रे, कैलास गुंजाळ, एबीई शाळेचे सचिव फादर डेनिस, फादर केनी, मुख्याध्यापिका डॉमिनिका डाबरे, प्राथमिक शिक्षक भारतीचे सरचिटणीस भरत शेलार, नाशिकचे अध्यक्ष प्रकल्प पाटील, रायगडचे हरिशचंद्र साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Sunday, 27 June 2021

50% उपस्थितीतून सुटका. वर्क फ्रॉम होमची परवानगी मिळाली

शिक्षक भारतीच्या आंदोलनाचे यश

मुंबईसह राज्यभरात 15 जून पासून नियमितपणे शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना उपस्थिती बंधनकारक करण्यात आली होती.  ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी दिली नव्हती. मागील पंधरा दिवसापासून आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून शिक्षक भारतीने सातत्याने प्रवास करण्याची परवानगी द्या अथवा वर्क फ्रॉम होम सुरु करा अशी मागणी लावून धरली होती. आज अखेर शिक्षण विभागाला उशिरा शहाणपण सुचले. मुंबई आणि एम एम आर विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम ची परवानगी मिळाली.







दहावीच्या निकालाशी संबंधित सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती आणि इयत्ता पहिली ते नववी ला शिकविणाऱ्या शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची अट लादण्यात आली होती. परंतु  ट्रेनने प्रवास करण्यास परवानगी देण्यास शासन तयार नव्हते. मुंबईतील शाळांमध्ये नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई विरार, कर्जत, कसारा, पालघरपासून ट्रेनने प्रवास करून काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.  ट्रेन सुरु नसल्याने दररोज 1000 ते 2000 रुपये खर्च करून खाजगी वाहने अथवा टॅक्सीने प्रवास करावा लागत होता. अनेकांना रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने विनातिकीट प्रवास करावा लागला. विनातिकीट प्रवास केल्याने नाहक दंड भरण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. बसने प्रवास करणाऱ्या महिला व पुरुष शिक्षकांना दररोज चार ते पाच तास प्रवास करावा लागत होता. याविरोधात शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटून निवेदन दिले होते. परंतु वारंवार आश्वासन देऊनही ट्रेनच्या प्रवासाची परवानगी देण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला. शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळाच्या विरोधात शिक्षक भारतीने मुंबईतील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयावर जोरदार आंदोलन केले. तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयातही जाऊन वर्क फ्रॉम होम सुरू करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास शिक्षक भारतीच्या महिला आघाडीने शिक्षणमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्धार केला होता. आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या अथवा ट्रेनचा प्रवास करण्याबाबत परवानगी मिळण्याबाबत विनंती केली होती. कपिल पाटील यांच्या मागणीनुसार शिक्षणमंत्र्यांना बोलावून याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यानुसार आज अखेर शिक्षक भारतीच्या सातत्यपूर्ण व जोरदार आंदोलनाची दखल शिक्षण विभागाला घ्यावी लागली. शिक्षण संचालक आणि शिक्षण उपसंचालक यांनी मुंबईसह एम एम आर रिजनमधील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे.


निकालाचे काम करणाऱ्यांना दिलासा नाहीच
शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आठ दिवसापूर्वी दहावीच्या निकालाशी संबंधित काम करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती लिंकद्वारे घेतली होती. पण त्याचे काय झाले हे अद्यापि स्पष्ट करण्यात आले नाही. ट्रेनची परवानगी देणे दूरच पण पास मिळणार की नाही हेही सांगितले जात नाही. शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी आज काढलेल्या पत्रानुसार निकाला संबंधी काम करणाऱ्यांना पर्यायी व्यवस्था काय करता येईल का? याची माहिती बोर्डाच्या सचिवांकडे मागितली आहे. एकूण काय शिक्षण विभागाचा गलथानपणा थांबलेला नाही. माहिती मागायची पण कार्यवाही काहीच करायची नाही. पण या सगळ्यांमध्ये शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचा कोणीही विचार करताना दिसत नाही. शिक्षण विभागातील अधिकारी झोपेत आहेत की काय? असा प्रश्न पडतो. शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षणमंत्री गांभीर्याने विचार करणार का? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

शिक्षण विभागाला संवेदनशील, वस्तुस्थितीला धरून निर्णय घेणारे, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्राधान्य देणारे आणि राज्यातील शाळांचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षणमंत्री कधी मिळणार? हा मोठा यक्षप्रश्न आहे.

आपला स्नेहाकिंत 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

Saturday, 26 June 2021

संघर्ष अभी रूका नहीं


26 जून 2006 ची संध्याकाळ. 
मुंबई शिक्षक मतदार संघातून पत्रकार असलेल्या कपिल पाटलांचा विजय झाला. मुंबईच्या शिक्षक मतदारसंघाचा चाळीस वर्षापासून राखलेला शिक्षक परिषदेचा गड पडला. सलग तीन टर्म आमदार असलेल्या श्रीमती संजीवनी रायकर मॅडमचा पराभव झाला. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनी मुंबईत पुरोगामी विचारांच्या नेतृत्वाचे नवे पर्व सुरू झाले. शिक्षक भारती संघटनेला पहिल्याच प्रयत्नात आमदार कपिल पाटलांच्या स्वरूपात दमदार यश मिळाले. ऑगस्ट 2005 साली गुरुवर्य अशोक बेलसरे सरांनी रात्र शाळांचे शिलेदार आणि दिवसा शाळेतील निवडक शिक्षक सोबत घेऊन शिक्षक भारती संघटनेची स्थापना केली. शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी ब्रीद वाक्य घेऊन आमदार कपिल पाटलांच्या नेतृत्वात शिक्षक भारतीचे काम सुरू केले. सांज दिनांक, महानगर, आज दिनांक वृत्तपत्रातील पत्रकारिता, रात्र शाळा वाचविण्यासाठी काढलेल्या बॅटरी मोर्चातील सहभाग, डी एड बीएड कॉलेजमधील कॅपिटेशन फीच्या विरोधातील लढा, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळविण्यासाठी केलेल्या संघर्षातील कामगिरीच्या जोरावर शिक्षक नसूनही आमदार कपिल पाटलांना मुंबईतील शिक्षकांनी आमदारकी दिली. विजयानंतरच्या आपल्या भाषणात कपिल पाटलांनी मुंबईतील शिक्षकांना दिलेलं वचन आज पर्यंत पाळले आहे. ते म्हणाले उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.

आपल्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार कपिल पाटील यांनी जोरदार कामगिरी केली. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारा शिक्षक आमदार असतो हेच आम्हा शिक्षकांना माहित झाले ते केवळ आमदार कपिल पाटलांमुळे.

महिनाभर काम करूनही पगारासाठी वाट पाहणाऱ्या मुंबईतील शिक्षक शिक्षकेतरांना महिन्याच्या एक तारखेला राष्ट्रीय बँकेतुन पगार सुरू झाला. महिला दिनी महिला शिक्षकांसाठी 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर केली. शिक्षकांना छळणारी आचारसंहिता रद्द केली. आर टी ई कायद्यानुसार पदवी धारण करणे बंधनकारक झाल्यानंतर हजारो शिक्षकांना यशवंतराव चव्हाण विद्यापीठामार्फत पदवी प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहित केले. अनुदानित शाळातील वाढीव तुकड्यांवर कार्यरत शिक्षकांना बंद पडलेल्या तुकड्यांचे समायोजन करून शंभर टक्के पगार सुरू केला. रात्र शाळांचे भाडे माफ केले. रात्र शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून थकबाकी सह वेतन मिळवून दिले. 26 जुलैच्या पावसात वाहून गेलेल्या शाळांना एकही पैसा खर्च न करता नव्या इमारती मिळवून दिल्या. अध्यापनाच्या 45 तासिकांचा जीआर रद्द केला. शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवून दिला. राज्यातील वाडी वस्तीवर तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या नऊ हजार वस्तीशाळा शिक्षकांना कायम करून पूर्ण पगार सुरु करणारा ऐतिहासिक लढा दिला.

शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी
शिक्षक आमदार असूनही आमदार कपिल पाटील यांनी नेहमीच विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळांचा दर्जावाढिला प्राधान्य दिले. अनुदानित शाळा टिकल्या पाहिजेत या भावनेतून आपल्या शाळांची गुणवत्ता वाढवण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच राज्यातील शाळांचा अभ्यासक्रम केंद्रीय बोर्डाप्रमाणे करण्याची मागणी केली. बिहार, केरळ व दिल्ली या तिन्ही राज्यात मुंबईतील शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व तज्ञ शिक्षक यांची टीम पाठवून शाळांच्या दर्जावाढिसंदर्भात राज्य शिक्षण विभागाला अहवाल पाठविला. आज आपल्या अभ्यासक्रमातील गणित आणि विज्ञान विषयात झालेला बदल हा त्याचा परिपाक आहे. मराठी विषयाची गोडी वाढावी व विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळावे यासाठी त्यांनी स्कोरिंग मराठी परिषद घेतली. मुंबईत दहावी बारावीच्या परीक्षांचा टेन्शन घेऊन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरू झालं होतं. आत्महत्या थांबवाव्या यासाठी विख्यात मानसोपचारतज्ञ श्री.आनंद नाडकर्णी यांच्या मदतीने तणाव मुक्त विद्यार्थी अभियान सुरू केलं. दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बदललं. दरवर्षी मुंबईत भरवल्या जाणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना व शिक्षकांना आमदार चषक आणि भरघोस बक्षीसांनी सन्मानित केलं. शिक्षकांच्या पगारासाठी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनुदानित व्यवस्था असल्याचे ते ठामपणे सांगत होते. शाळांच्या भेटीदरम्यान एखाद्या शाळेत विद्यार्थी वर्गाबाहेर उभा असलेला दिसला तर शाळेच्या मुख्याध्यापकांशी व शिक्षकांशी चर्चा करून त्या मुलाला वर्गात पाठविण्याबाबत ते आग्रही असतात. शाळा म्हणजे संविधान शिकण्याचं केंद्र  ते मानतात. शाळांमध्ये देव देवतांची पूजा, सरस्वतीची पूजा, सत्यनारायणाची पूजा यावर आक्षेप घेतात. आपल्या सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. सावित्री फातिमाचा केवळ फोटो लावत नाही तर शिक्षक भारती संघटनेतील प्रत्येक सदस्याच्या मनात सावित्री फातिमाचा विचार पोहचविण्यासाठी धडपडणारे कपिल पाटील मी पाहत आलो आहे. हिंदी भाषा वगळण्याचा निर्णयाला विरोध करण्यासाठी केलेला प्रयत्न असो किंवा हिंदी भाषिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे विरोधात केलेले उपोषण असो कपिल पाटील न डगमगता ठाम भूमिका घेतात. माझी मते कमी होतील, सनातनी विचारांचे लोक विरोधात जातील याची कधीही त्यांनी पर्वा केली नाही. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, साधी राहणी आणि पुरोगामी विचारसरणी हेच त्यांच्या हँट्रिकच्या यशाचं कारण असेल.

जनतेच्या प्रश्नांसाठी
मागील पंधरा वर्षात कपिल पाटलांनी केवळ शिक्षण क्षेत्रातील नव्हे अनेक सामाजिक प्रश्नांवर सभाग्रहात आणि सभागृहाबाहेर आवाज उठविला. खाजगी विद्यापीठ बिलाला आमदार कपिल पाटील यांनी कडाडून विरोध केला. विरोध करणारे ते एकमेव आमदार होते. अखेर सरकारला गरिबांसाठी आरक्षणाची तरतूद त्या करावी लागली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिप्रेत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याच्या निर्मितीमध्ये न्या. धर्माधिकारी यांच्यासोबत आमदार कपिल पाटील यांनी महत्वाची कामगिरी बजावली. मुंबईच्या कोळीवाड्यांच्या प्रश्न, स्ट्रक्चरल ऑडिटचा प्रश्न, महाग होणाऱ्या म्हाडाच्या घरांचा प्रश्न, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, मानखुर्द येथील झोपडपट्टीतील पाणीप्रश्न, वाशी नाका परिसरातील कब्रस्तानचा प्रश्न या प्रत्येक ठिकाणी आमदार कपिल पाटलांना सोबत काम करताना लढायचं कसं? प्रश्नांना वाचा फोडायची कशी? हे आम्हा सर्वांना शिकता आलं. त्यांनी नेहमीच संघटनेचे नेतृत्व तरुणांना दिले.त्यातूनच शिक्षक भारती संघटनेची केवळ मुंबईतच नव्हे संपूर्ण राज्यभर अभेद्य अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. आज शिक्षक भारती संघटना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी पाय रोवून उभी आहे.

संघर्ष अभी रुका नही
सरकार कोणाचेही असो कपिल पाटलांना दोन हात करावेच लागतात. कारण कपिल पाटलांची बांधिलकी कोणत्या पक्षाशी नाही तर ती सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाशी आहे. समानतेशी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते अनेकदा एकटे पडतात. मोठ मोठ्या राजकीय संधींना मुकतात. पण लढत राहतात. वर्सोवा येथे म्हाडा सोसायटीतील आमदारांना मिळणारा फ्लॅट नाकारताना अथवा नितीश कुमार यांच्या गटात राहून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणारा समावेश नाकारताना आमदार कपिल पाटील एका क्षणात निर्णय घेतात. तत्त्वांशी तडजोड न करता नकार देतात. ही मोठी गोष्ट आहे. भलेभले समोर आलेल्या संधी मिळवण्यासाठी तडजोडी करतात, भूमिका बदलतात, लोटांगण घालायला तयार होतात. पण आमदार कपिल पाटील या सर्व परिस्थितीत ताठ कण्याने उभे राहतात. हे चित्र आज दुर्मिळ झाले आहे.

सध्य परिस्थितीत कोरोनामुळे शिक्षण आणि शिक्षकांवर मोठे संकट ओढवले आहे. एक तारखेला पगार मिळत नाही. शाळेत उपस्थिती बंधनकारक आहे पण रेल्वेची परवानगी नाही. पेन्शनचा प्रश्न बिकट बनला आहे. टप्पा अनुदानासाठी झगडावे लागत आहे. 12 वर्षे व 24 वर्षाची श्रेणीलाभ मिळत नाही. रात्र शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. दिवसेंदिवस प्रश्न वाढत आहे.  कपिल पाटलांचा लढा थांबलेला नाही. शिक्षणमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे शासन दरबारी कोरोना कालावधीतही सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. शिक्षक भारती, मुंबईतील सर्व शिक्षक त्यांच्या प्रत्येक लढयात सोबत उभे आहेत. मला खात्री आहे परिस्थिती कितीही बिकट असली तरीही आमदार कपिल पाटील मात केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य 

#कार्यकर्ताआमदारकपिलपाटील 
#कपिलपाटीलआमदारकीची१५वर्ष

Thursday, 17 June 2021

अनुदान आणि पेन्शन कोंडी फुटणार का?


दिनांक 16 जून 2021 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना. श्री अजितदादा पवार यांच्या दालनात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आणि टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 100% पगार देण्याबाबत आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेसोबत बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षणमंत्री मा. ना. वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, वित्त विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, कार्यवाह प्रकाश शेळके उपस्थित होते.


जुनी पेन्शन योजना लागू करा
आमदार कपिल पाटील यांनी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन पदावर नियुक्त आणि वस्तीशाळेवर नियुक्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना केली पाहिजे अशी मागणी केली. राज्याने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त सर्व शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना केली आहे, पण शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांबाबतच भेदभाव का केला जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली तर शासनावर आर्थिक भार वाढत आहे असा चुकीचा समज पसरवला जात आहे हे आमदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केले. 

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास या सर्व कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची कपात शासनाकडे जमा होते. पण या सर्वांना डी सी पी एस आणि आताची एनपीएस योजना लागू केली तर राज्य शासनाला दरमहा 14 टक्के शासन हिस्सा म्हणून जमा करावी लागणारी रक्कम जास्त आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास शासनावर अधिक भार न येता शासनाकडे भविष्य निर्वाह निधीतून रक्कम जमा होते. तसेच  दरवर्षी कर्मचारी टप्प्याटप्प्याने निवृत्त होत असल्याने शासनावर एकाच वेळी पेन्शनचा भार येणार नाही. शासनाकडे पैसे नव्हते म्हणून या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात आले त्यात कर्मचाऱ्यांची चूक काय? असा सवाल उपस्थित केला. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी वित्त विभागाने मान्यता देणे आवश्यक आहे असे सांगितले.

माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आमदार कपिल पाटील यांनी मांडलेला मुद्दा धोरणात्मक असल्याचे त्याबाबत मंत्रीमंडळाची आधी परवानगी घ्यावी लागेल असे मत मांडले. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी तसा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत सादर करावा असे सुचवले.

बैठकीबाबत उपमुख्यमंत्री कार्यालयाचे पत्र


आमदार कपिल पाटील यांनी अजितदादांना लिहलेले पत्र.
 

100%  पगार द्या
शिक्षण विभागाच्या अनुदान देण्याच्या प्रचलित धोरणानुसार राज्यातील सर्व पात्र प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना 100 टक्के पगार देणे आवश्यक असताना केवळ 20% वर बोळवण केली जात आहे. 20%  पगारावरून 40% चा टप्पा सुरू होताना हजारो कर्मचाऱ्यांना वगळण्यात येत आहे. विविध स्तरावरच्या तपासण्या, त्रुटी या सर्वांचा सामना करावा लागत आहे.  हे सर्व कर्मचारी गेली पंधरा ते सतरा वर्ष काम करत आहेत. या सर्वांना शंभर टक्के पगार देणे शक्य आहे. 

सन 2012 सालापासून शिक्षकांची भरती बंद आहे. 2004 सालापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. वयोमानानुसार निवृत्त झाल्याने अथवा मृत्यू झाल्याने शिक्षक-शिक्षकेतर संख्या कमी होत आहे. शिक्षण विभागाला मंजूर असणारी पदे आणि कार्यरत पदे यांची गोळाबेरीज केली तर सुमारे एक लाख पदे रिक्त असल्याचे स्पष्ट होईल.  टप्पा अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पन्नास हजार पेक्षा कमी आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन अनुदानित मंजूर पदावर केल्यास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार दिला जाऊ शकतो अशी मांडणी आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबतच्या बैठकीत केली. 

माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी आमदार कपिल पाटील यांनी मांडलेल्या मांडणीचा सकारात्मक विचार करून याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्याचे मान्य केले. मुंबईमधील बंद पडलेल्या अनुदानित तुकड्यांचे उपनगरातील नैसर्गिक वाढीव तुकड्या वर समायोजन करून विनाअनुदानित तुकड्यांमधील शिक्षकांना शंभर टक्के पगार दिल्याचे उदाहरण आमदार कपिल पाटील यांनी यावेळी बैठकीत दिले. त्यानुसार शासनाने ठरवल्यास सर्व पात्र प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पगार देणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब यांनी वित्त विभाग आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी वर्गासोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. जुनी पेन्शन आणि अनुदान यांची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने कालची बैठक हे अतिशय महत्त्वाचे पाऊल होते. नजीकच्या काळात या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी अपेक्षा करूया.

आपला स्नेहाकिंत
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

-------------------------------

आमदार कपिल पाटील यांचे नवनवीन ब्लॉग वाचण्यासाठी क्लीक करा -