Tuesday 15 May 2018

निवडणूक तारखा पुढे ढकलल्या त्याची गोष्ट


शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका ८ जून २०१८ ला होण्याची बातमी येताच डोळ्यासमोर २००६ सालचा घटनानुक्रम आला. पूर्वी निवडणुका कधी व्हायच्या? हे कोणालाच कळायचे नाही. शिक्षकांना आमदार असतो याची माहितीही अनेकांना नव्हती. शिक्षक भारतीने २००६ साली मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील यांना उमेदवारी दिली होती. रात्रशाळा व रात्र कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी अनेक वर्षांपासून भाजप प्रणित शिक्षक परिषदेकडे असणारी जागा खेचून आणण्याचा निर्धार केला होता. मुंबईतील सर्व शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन नोंदणी सुरु केली. तेव्हा अनेकांनी शिक्षकांना आमदार असतो, हे आम्हाला माहितच नाही, शिक्षक मतदार संघाची नोंदणी नेमकी कशी होते? मतदान कधी होते? शिक्षकांचा आमदार नक्की काय काम करतो? असे एक ना अनेक प्रश्न शिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांना विचारले. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातील तरतूदींनुसार शिक्षकांना ज्यादाचा मताधिकार दिला असून आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायचा आहे. आपण मतदार झाले पाहिजे. तरच आपण मतदान करु शकतो. आपल्या हक्काचा माणूस निवडून आणू शकतो, अशी जनजागृती अशोक बेलसरे आणि चिकोडीकर सरांच्या नेतृत्वाखाली सर्व रात्रशाळांतील शिलेदारांनी केली. मधुकर कांबळे, अरुण खाडीलकर, अंकुश जगदाळे, दिनेशकुमार त्रिवेदी, एस. वाय. देशपांडे, डी. एस. पवार, सय्यद सर, मुमताज खोजा, जयवंत पाटील ... या सर्वांनी आपल्या दिवसाच्या शाळेतील सर्व शिक्षकांची नोंदणी पूर्ण केली. जोरदार प्रचार केला. उन्हाळी सुट्टीनंतर होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष होते. 

अचानक ८ मे २००६ ला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिक्षक मतदार संघातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. ८ जून २००६ ला मतदानाची तारीख ठरली. आणि शिक्षक हिरमुसले. आपले सर्व शिक्षक उन्हाळी सुट्टयांनिमित्त गावी गेले होते. काहीजण कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले होते. मतदारच नसतील तर मतदान होणार कसे? आपला उमेदवार निवडून येणार कसा? पूर्वीप्रमाणेच ठरलेले मोजकेच मतदार मतदान करणार आणि जवळपास १३०० मतांवर परिषदेचाच उमेदवार पुन्हा निवडून येणार अशी स्थिती निर्माण झाली. सर्व प्रमुख आणि कपिल पाटील यांची बैठक झाली. दिल्लीला जायचं ठरलं. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून वस्तुस्थिती सांगण्यासाठी स्वतः कपिल पाटील दिल्लीत पोचले. प्रश्नांची जाण आणि ती सोडवण्याची हातोटी असणार्या कपिल पाटलांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना मुंबईतील वस्तुस्थिती सांगितली. एक मोठा निर्णय झाला. १३ मे २००६ ला मुख्य निवडणूक आयुक्तांनी आधीचा निर्णय रद्द करुन नवीन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणुका २४ जून २००६ होतील, असे जाहीर केले. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध झाली. म्हणून मुंबईत शिक्षक भारतीने इतिहास घडवला. ४० वर्षांपासून भाजप प्रणित शिक्षक परिषदेकडे असणारा मतदार संघ खेचून आणला. त्यामुळेच शिक्षण क्षेत्रात गेली १२ वर्षे शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी लढणारा एक आमदार आपणा सर्वांना देता आला. 

इतिहासाची पुनरावृत्ती १२ मे २०१८ च्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पत्राने होते की काय? अशी शंका निर्माण झाली होती. ऐन सुट्टीच्या काळात ८ जून २०१८ रोजी बाहेर गेलेले मतदार मुंबईत परतणार कसे? हा तो प्रश्न होता. 

यावेळी मतदार नोंदणी करताना अनेक अडचणी येत होत्या. छोट्या छोट्या शुल्लक कारणांवरुन अर्ज बाद केले जात होते. अनेक ठिकाणी तर अर्जच स्विकारले जात नव्हते. नोंदणीची प्रक्रिया क्लीष्ट आणि कठीण झाल्याने पहिल्या टप्प्यात केवळ ७६०० नोंदणी होऊ शकली. दोन-दोन वेळा फॉर्म भरुनही अनेक शिक्षकांची मतदार यादीत नावे आली नाहीत. अनेकांनी शिक्षक मतदार संघात नोंदणीच होऊ नये यासाठी केलेला प्रयत्न त्याला कारणीभूत होता. ८ जून २०१८ रोजी मतदान झाले तर शिक्षक, पदवीधर मतदारांना मतदानच करता येणार नव्हते. बाहेरगावी गेलेल्या अनेकांचे फोन आले. मेसेज आले. तुम्ही बोलवाल तेव्हा आम्ही मतदानासाठी हजर होऊ, असे आवर्जून सांगितले. शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासदांनी ८ जूनला कसे काय मतदान होऊ शकते? असा सवाल केला. आमदार कपिल पाटील आणि जालिंदर सरोदे यांच्यासाठी दोनच दिवसात सर्व टीम शिक्षक भारती मुंबईला हजर व्हायच्या तयारीला लागली. कारण यावेळी आम्हा सर्वांचा मुंबईतून दोन आमदार देण्याचा पक्का निर्धार आहे. २००६ ला झालेल्या निवडणुकीच्या तारखांमध्ये आपण बदल घडवून आणल्याचा अनुभव आपल्या गाठीशी होता. त्यामुळे सर्वांना दोन दिवस थांबण्याचे आवाहन केले. 

१४ मे २०१८ रोजी मी आणि आमदार कपिल पाटील भारत निर्वाचन आयोग, निर्वाचन सदन, नवी दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयात सकाळी १० वाजता हजर झालो. संपूर्ण देशाचा निवडणुकांचा कारभार विविध विभागांमार्फत सुरु असल्याने महाराष्ट्राचं कामकाज बघणार्या ऑफिसरशी संपर्क होत नव्हता. रिसेप्शनवर असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने विविध विभागात फोन लावून तासाभराने सर्व सोपस्कार पूर्ण करुन आम्ही मुख्य निवडणूक आयुक्ता मा. श्री. ओमप्रकाश रावत यांच्या कार्यालयात पोचलो. तेथील अधिकाऱ्यांनी सन्मानाने आम्हाला अतिथी कक्षात बसवले. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकांचा कारभार पाहणारे निवडणूक उपायुक्त श्री. चंद्रभूषण यांनी आमचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. तसेच स्वतः माहिती घेऊन नंतर आयुक्तांकडे जाऊया असे सांगितले. १५ मिनिटांनंतर मुख्य निवडणूक आयुक्त मा. श्री. ओमप्रकाश रावत यांनी आम्हाला बोलावले. निवडणूक आयोग स्वायत्त व स्वतंत्र असून त्याचा कारभार पाहणारी व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेईल का? अशी शंका मनात होती. पण आम्ही श्री. रावत यांच्या दालनात प्रवेश करताच स्वतः उभे राहून त्यांनी आमचे स्वागत केले. ८ जून २०१८ रोजी निवडणुका झाल्या तर अनेकांना मतदान करता येणार नाही. उन्हाळी सुट्टयांमुळे अनेक शिक्षक बाहेरगावी अथवा कुटुंबासमवेत पर्यटनासाठी गेल्याने इच्छा असूनही त्यांना परत येता येणार नाही. परतीच्या तिकीटाचे आरक्षण ठरलेले असते इतक्या लवकर ते बदलणे शक्य नाही. शाळा कॉलेज १५ जून व १८ जून रोजी सुरु होणार असल्याने त्याआधी ८ जून रोजी शिक्षक व पदवीधर मतदार संघातील मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी सर्व स्थिती आमदार कपिल पाटील यांनी श्री. रावत यांना सांगितली. तसेच २००६ साली असेच घडले तेव्हा तत्कालीन आयुक्तांनी निवडणुकांच्या तारखा बदलल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमचे निवेदन स्विकारुन त्वरीत त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश श्री. रावत यांनी दिले. 

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयातील श्री. सरबजीत यांच्याकडे २००६ आणि २०१२ साली झालेल्या निवडणूक कार्यक्रमांची निवडणूक आयोगाच्या प्रेस नोट आणि इतर सर्व कागदपत्रे सादर केली. त्यांना झालेल्या कार्यवाहीची माहिती आम्हाला देण्याबाबत विनंती केली. 

त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी दिल्ली विमानतळावर पोचलो. इतक्यात श्री. सरबजीत यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांनी मान्य केल्याची बातमी मिळाली. त्यानंतर आयोगाचे सचिव श्री. सुमनकुमार दास यांनी फोनवरुन आमदारांना १२ मे २०१२ जारी केलेले निवडणूक कार्यक्रम पत्र मागे घेतल्याचे सांगितले. तसेच निवडणुका उन्हाळी सुट्टीनंतर म्हणजे १८ जून नंतर घेण्यात येतील असेही ते म्हणाले. 


(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)
(क्लीक करा आणि मोठे करून वाचा)
शाळा, कॉलेज सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रातील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होणार हे आता स्पष्ट झाले. आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सर्वांनाच फायदा झाला. सर्व शिक्षक आणि पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. आमदार कपिल पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्याचं काम पुन्हा एकदा केलं आहे. आता जबाबदारी आपली आहे. मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल हरिश्चंद्र पाटील आणि मुंबई पदवीधर मतदार संघातून जालिंदर देवराम सरोदे यांना बहुमताने निवडून देऊन आपण आपला निर्धार पूर्ण करुया. 

आपला,
सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य.