Thursday 28 September 2023

शिक्षण वाचवण्यासाठी सत्याग्रह



राज्याचे शिक्षण आयुक्त मा श्री सुरज मांढरे यांनी दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी विद्यार्थी गुणवत्तेसाठी शाळा समुह योजना सुरू करण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना 15 ऑक्टोबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करून शाळा समूह उभारण्याच्या दृष्टीने हे प्रस्ताव विहित नमुन्यात दाखल करावयाचे आहेत.

राज्यात सन 2021-22 च्या संचमान्यतेतील आकडेवारीनुसार 20 पेक्षा कमी पट संख्येच्या सुमारे 14783 शाळा सुरू असून त्यामध्ये 1 लाख 85 हजार विद्यार्थी शिकत आहेत. या शाळेत 29 हजार 707 शिक्षक कार्यरत आहेत‌. दुर्गम भागातील वाडीवस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पोहोचावे यासाठी शालेय शिक्षण विभागाने या शाळा सुरू केल्या होत्या‌. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या शिफारशीनुसार आता या शाळांचे शाळा समूहात रूपांतर केले जाणार आहे.

शाळा समूह योजनेमागे शासनाची भूमिका काय?
समूह शाळा निर्माण करण्यामागे राज्य शासनाचा शाळा बंद करणे किंवा शिक्षकाची पदे कमी करणे हा उद्देश नाही तर गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा मिळाव्यात व त्यांच्यामध्ये शिक्षणातील विविध अध्ययन क्षमता विकसित होण्यास वाव मिळावा हा यामागील प्रमुख उद्देश आहे असे शासनाचे म्हणणे आहे. समूह शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातील. खेळ,संगीत,कला यांच्यासाठी शिक्षक मिळू शकतील, असा दावा शालेय शिक्षण विभागाने केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे यासाठी सरकारी निधीतून किंवा सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे शिक्षण आयुक्तांच्या पत्रात नमूद केले आहे‌. शाळा समूह विकसित करण्याचे निर्देश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे‌. या पत्रामध्ये पानशेत जिल्हा पुणे यांचा समूह शाळेबाबत प्रस्ताव उदाहरणादाखल उपलब्ध करून दिला आहे. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून शिक्षणाधिकारी यांनी आपापल्या जिल्ह्यातील कमी पट संख्येच्या सर्व शाळांचा विचार करून त्यांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करण्याचा प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करायचा आहे. हे सदर प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

शाळा समूह योजनेचे वास्तव
१)राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री मा श्री अजित दादा पवार यांनी शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षकाच्या पगारात तीन तीन कर्मचारी उपलब्ध होऊ शकतात असे विधान करून 6 सप्टेंबर 2023 च्या खाजगीकरण व कंत्राटीकरण करणाऱ्या शासन निर्णयाचे समर्थन यापूर्वीच केलेले आहे.
 
२) राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र
जी फडणवीस यांनी वारंवार शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पगार/पेन्शन/भत्ते यावर शासनाचा 80 टक्के निधी खर्च होतो हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 

३) 28 ऑगस्ट 2015 रोजी तत्कालीन शिक्षण मंत्री मा श्री विनोदजी तावडे यांनी संच मान्यतेचे निकष बदलून हजारो शिक्षकांची पदे यापूर्वीच कमी केलेली आहेत. अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. 

४) 11 डिसेंबर 2020 रोजी राज्यातील शिपाई पद संपुष्टात आणून कंत्राटीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

५) सन 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे. 

६) सन 2004 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व पदोन्नती बंद आहे.

७) देशातील दक्षिणेकडील राज्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला विरोध केला असून प्रत्येक राज्याने आपले स्वतःचे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्याने शाळा समूह योजना हा त्याचाच एक भाग आहे. त्याची अंमलबजावणी शालेय शिक्षण विभागाने सुरू केल्याचे हे द्योतक आहे. 

८) तत्कालीन शिक्षण मंत्री मा श्री विनोदजी तावडे यांनी तेरा हजार शाळा बंद करण्याचा घाट घातला होता. त्यावेळी राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून हा निर्णय हाणून पाडला होता. परंतु आता त्याच निर्णयाची अंमलबजावणी शासन विद्यार्थी गुणवत्ता व भौतिक सुविधांचे मुलामे चढवून करण्याचा प्रयत्न करत आहे. 

९) अनुदानित शाळेशेजारी सेल्फ फायनान्स शाळांना परवानगी देऊन जाणिवपूर्वक अनुदानित शाळेतील विद्यार्थी संख्या कमी केली जात आहे.

१०) विविध अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर ठेवून अनुदानित व शासकीय शाळेतील शिक्षण व्यवस्था मोडकळीस आणली जात आहे.

शाळा समूह योजना म्हणजे केवळ धूळ फेक असून सामान्य, गरीब, दलित, मागासवर्गीय, डोंगरदऱ्यांमधील दुर्गम भागात राहणारे विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी यांना शिक्षणापासून रोखण्याचा हे षडयंत्र आहे.  हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.

शाळा समूह योजनेतील प्रमुख त्रुटी/आक्षेप
शाळा समूह योजना म्हणजे बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 या कायद्याचे उल्लंघन होय. या कायद्यान्वये बालकांच्या निवासापासून एक किलोमीटरच्या परिसरात प्राथमिक शिक्षण व तीन किलोमीटर परिसरात उच्च प्राथमिक शिक्षण मिळण्याची हमी विद्यार्थ्याला देण्यात आलेली आहे. ती हमी हिसकावून घेण्याचे काम शाळा समूह योजना करते.

१) शाळा समूह योजनेमध्ये ज्या शाळेची समूह शाळा म्हणून निवड करण्यात येणार आहे त्या शाळेत भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी कोणत्याही ठोस शासकीय अनुदानाची/निधीची व्यवस्था करण्यात आलेली नाही.

२) कमी पटसंख्यांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना मोफत ने आण करण्यासाठी शालेय बसची सुविधा सीएसआर फंडावर अवलंबून असणार आहे. ज्या ठिकाणी सीएसआर फंड उपलब्ध होणार नाही त्या ठिकाणी बसची व्यवस्था कोण करणार? याचे उत्तर शासनाने दिलेले नाही. 

३) मोफत बसवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला किती पगार मिळणार?  त्याला नोकरीची शाश्वती असणार का? याबाबत स्पष्टता नाही.  

४) खाजगी कंत्राटाद्वारे नेमलेल्या चालकाकडे अथवा चालकासोबतच्या पर्यवेक्षकाकडे पालक आपली मुले सोपवताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? याचे उत्तर पालकांना मिळणार नाही. 

५) दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी रस्ते नाहीत. पावसाळ्यामध्ये प्रवास करणे शक्य नाही. अशा ठिकाणी पर्यायी काय व्यवस्था असणार? याबाबत ठोस पर्याय सुचवले गेलेले नाही. 

६) शाळा समूह योजनेचा पुरस्कार करून दुर्गम, डोंगराळ भागात वाडी वस्तीवर सुरू असलेल्या शाळा बंद करण्याचा शासनाचा हेतू समोर येत आहे.

७) 2012 पासून भरती बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षक मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण विभागावर विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीचा विश्वास उरलेला नाही.
 
८) शाळा समूह योजनेतून कला, संगीत व क्रीडा यासाठी स्वतंत्र शिक्षक देण्याचे सुतोवाच केले आहे.  परंतु त्या अगोदर संच मान्यतेच्या निकषांमध्ये या विशेष शिक्षकांचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही.  कला, संगीत व क्रीडा यासाठी कायमस्वरूपी शिक्षक नेमणार की कंत्राटाद्वारे नेमणार? याबाबत कोणतीही स्पष्टता शासनाने केलेली नाही.

९) खाजगी कंपन्यांना शाळा दत्तक देण्याच्या जीआर ने शासन 2009  पासून आज पर्यंत राज्यातील शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यास अपयशी ठरल्याचे मान्य करण्यात आलेले आहे.  त्यामुळे शासनाने राज्यातील शाळा खाजगी कंपन्यांना विकायला काढलेल्या आहेत. जी कंपनी शाळेत भौतिक सुविधा निर्माण करेल तिचे नाव शाळेला देण्याचा निर्णय शासनाने घेऊन आपण अनुदानित शिक्षण देण्यास असमर्थ आहोत हे कबूल केले आहे.

१०) शाळा समूह योजनेमुळे राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या तर ग्रामीण, आदिवासी,डोंगराळ भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण व्यवस्थे बाहेर फेकले जातील. तसेच या विद्यार्थ्यांना शिकवणारे जवळपास 30000 शिक्षक अतिरिक्त ठरतील. अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. कमी पटसंख्येच्या शाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हमी घेणारे हे शिक्षक अतिरिक्त करून राज्यातील अनुदानित शिक्षण व्यवस्था बंद करण्याचा शासनाचा हा डाव आहे. अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्याबाहेर समायोजन केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होईल. शिक्षकाने कामाला लागताना जिल्ह्याची निवड केलेली असते. अशावेळी शिक्षकांना अतिरिक्त ठरवून जिल्हा बाहेर पाठवणे म्हणजे शिक्षकांचे हाल करणे होय. महिला शिक्षकांना कुटुंबापासून दूर जावे लागणार आहे‌.

शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने रद्द करून शिक्षकांना अतिरिक्त करण्याची प्रक्रिया थांबवावी यासाठी शिक्षक भारतीसह सर्व संघटना एकवटल्या आहेत. खाजगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी, शाळा दत्तक योजना बंद करण्यासाठी व शाळा समूह योजना थांबवण्यासाठी आता सर्वांना एकत्र येऊन लढावं लागेल. जोपर्यंत हे सर्व निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत माघार घेता कामा नये.

2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून  शिक्षण वाचवण्यासाठी सत्याग्रह आंदोलन करण्याचा निर्धार शिक्षक भारतीने केला आहे. मला खात्री आहे आपण सर्वजण या सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हाल.
लढेंगे जितेंगे

सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष, शिक्षक भारती



Monday 11 September 2023

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठबिगारी करायला लावणाऱ्या 6 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयाचा जाहीर निषेध

खाजगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा शिक्षक भारतीची मागणी



सरकारने बाह्य यंत्रणेकडून (कंत्राटदार) राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरण्याचा शासन निर्णय दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी घेतला आहे.

नऊ बाह्यसेवा पुरवठादार संस्थेच्या पॅनलला शासनाची मान्यता

बाह्य यंत्रणेकडून काम करून घेण्यासाठी सरकारने नऊ सेवा पुरवठा संस्था आणि पॅनलची नियुक्ती केली आहे. यामध्ये अति कुशल मनुष्यबळाच्या वर्गवारीत 65 प्रकारची पदे भरली जातील. अकुशल वर्गवारीत 10 प्रकारची पदे, अर्धकुशल वर्गवारीत 8 आणि कुशल वर्गवारीत 50 प्रकारची पदे कंत्राटदाराच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे राज्यातील शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर आस्थापना मधील पदे भरण्याची मुभा कंत्राटदार संस्थांना मिळणार आहे.

शिक्षक शिक्षकेतरांचा पुरवठा कंत्राटदार करणार

शिक्षकांचा कुशल मनुष्यबळ वर्गवारीत समावेश करून राज्यातील डीएड, बीएड, त्यासोबतच टीईटी पात्रताधारक शिक्षकांची पदे येत्या काळात खाजगी कंत्राटदार संस्थेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. यामध्ये बीएड त्यासोबतच पदवी आणि टीईटीपात्रता असलेल्या आणि तीन वर्ष अनुभव असलेल्या शिक्षकांना 35 हजार रुपये प्रतिमाह मानधन दिले जाणार आहे. तर दुसरीकडे सहाय्यक शिक्षकासाठी प्रतिमाह 25 हजाराचे मानधन निर्धारित करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने केली मोठी फसवणूक

राज्यातील शिक्षण विभागात सुमारे एक लाख पदे रिक्त आहेत. 2012 पासून पदभरती झालेली नाही. 28 ऑगस्ट 2015 रोजीच्या शासन निर्णयाने संच मान्यतेचे निकष बदलून शासनाने यापूर्वीच राज्यातील शिक्षक पदांची संख्या कमी केलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आज राज्यांमध्ये सहा लाखापेक्षा जास्त डीएड, बीएड पदवीधारक तरुण बेरोजगार आहेत. शासकीय डीएड बीएड कॉलेजेस ओस पडलेली आहेत. वेळोवेळी पक्षांची सरकारे बदलली पण भरती झालेली नाही. शिक्षण विभागात मोठी भरती होणार म्हणून टीईटी परीक्षा घेण्यात आली. अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. विविध परीक्षांच्या नावाखाली कोट्यावधी रुपये परीक्षा फी म्हणून जमा करण्यात आलेले आहेत. परंतु भरती करण्यात आलेली नाही. शिक्षण विभाग वारंवार भरती करणार अशी घोषणा करतो परंतु प्रत्यक्षात भरती होत नाही. आणि आता भरती करताना मानधनावर भरती करण्याचा निर्णय घेऊन शासनाने लाखो बेरोजगार तरुणांची मोठी फसवणूक केली आहे.

शिक्षकांचा पगार डोळ्यात का खूपतो?

शासन कोणत्याही पक्षाचे येऊ दे, प्रत्येकाच्या डोळ्यात शिक्षकांचा पगार खूपतो. शासनातील प्रत्येक अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करतो. राज्यांमध्ये सुमारे सात लाख शिक्षकांची पदे वेतन घेत होती. सेवानिवृत्तीमुळे किंवा मृत्यूमुळे पदे कमी होत गेली. 2012 पासून भरती न झाल्याने आज राज्यात केवळ साडेचार लाख पदे पगार घेत आहे. शासनाने राज्यातील दीड लाख पदे कमी केलेली आहेत. जवळपास एक लाख पदे रिक्त ठेवलेली आहेत. 2004 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. जानेवारी 2019 मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला. पद वाटप झाले. परंतु सरकारला भरतीचा मुहूर्त सापडलेला नाही. राज्यातील हजारो शाळांमध्ये एकही शिपाई नाही. 11 डिसेंबर 2020 रोजी शासनाने या राज्यातील शिपाई पदे संपुष्टात आणलेली आहेत. शाळांमध्ये एकही लिपिक नाही. अशी स्थिती आहे. ग्रंथपाल, लॅबअसिस्टंट, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक अशी अनेक पदे रिक्त ठेवून हे सरकार शिक्षणाचा दर्जा उंचावण्याची भाषा करते हे खरंच हास्यस्पद आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विषयाला शिक्षक नाही. शाळांच्या सोयी सुविधांसाठी शासनाकडे पैसा नाही. आता शासन खाजगी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून राज्यातील शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याचा निर्णय घेत आहे. शिक्षकांवर दिवसेंदिवस अशैक्षणिक कामांचा बोजा वाढवण्यात येत आहे. अनुदानित शाळेतील शिक्षकांनी वर्गात शिकवू नये यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. अनुदानित शिक्षण बंद करण्याचे हे मोठे षडयंत्र आहे. विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स, आयसीएसई, सीबीएसई, आयबी शाळांमध्ये व्यवस्थितपणे शिक्षण सुरू आहे. गुणवत्ता वाढीचे प्रयत्न सुरू आहेत. तिथे शासकीय यंत्रणा हस्तक्षेप करायला जात नाहीत. शालेय व्यवस्थापन शैक्षणिक दर्जावाढ व गुणवत्ता वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे समाजामध्ये अनुदानित शाळांची प्रतिमा मलिन होऊन खाजगी विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स शाळांमध्ये मुलं घातली तरच शिक्षण होईल असे चित्र शासनाने निर्माण केले आहे.


शिक्षक भारती गप्प बसणार नाही

6 सप्टेंबर 2023 च्या खाजगीकरण व कंत्राटीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या शासन निर्णयाचा शिक्षक भारती संघटना जोरदार विरोध करणार आहे. शिक्षक भारती संघटनेचे राज्यपदाधिकारी, विभागीय अध्यक्ष,सर्व जिल्हाध्यक्ष आपापल्या स्तरावर मोठ्या आंदोलन उभे करणार आहेत. कंत्राटीकरणाचा हा जीआर रद्द होईपर्यंत शिक्षक भारती संविधानिक मार्गाने लढत राहील. कारण हा कंत्राटीकरणाचा जीआर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वावर घातलेला मोठा घाव आहे. 25000 ते 35000 मानधनावर शिक्षकांना राबवून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे. भविष्यात 25000 ते 35000 मानधनावर शिक्षक काम करू लागले तर विद्यमान शिक्षकांची वेतनवाढ, घरभाडे, महागाई भत्ता, प्रवास भाडे इत्यादी सर्व सुविधा बंद करताना सरकार मागे पुढे पाहणार नाही. यासाठी आता गप्प बसून चालणार नाही गरज पडली तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल.
लढेंगे! जितेंगे!

संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी Click करा - https://drive.google.com/file/d/1BEJPR5J_3KFCEnMKPaV4cGzfUsNXCcUP/view?usp=sharing


आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे
कार्याध्यक्ष
शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य