Wednesday, 15 March 2017

प्लॅनमधल्या शिक्षकांना दिलासा मिळणार

प्लॅनमधल्या शाळा - कॉलेजमधील शिक्षक - शिक्षकेतरांना अनियमित पगाराची चिंता आता मिटणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय वर्षापासून शासनाचे योजना आणि योजना बाहय खर्च ही विभागणी बंद होणार असून सर्व पगार हे अनिवार्य खर्चात दाखवले जाणार आहे. ही माहिती स्वतः राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) दिनेशकुमार जैन यांनी आमदार कपिल पाटील यांना दिली. त्यामुळे अशा २१ हजार शिक्षक -शिक्षकेतरांना लवकरच नियमित पगार मिळणार आहे. अर्थसंकल्पात एकदा हा विषय मार्गी लागला की पुढची कार्यवाही शिक्षण विभागाने करायची आहे. 

अनेक वर्षापासून प्लॅनमधील शिक्षक शिक्षकेतरांना कधीही नियमित पगार मिळत नव्हता. दरमहा गृहकर्जाचे हप्ते आणि इतर दैनंदिन खर्च यासाठी उसनवारी करावी लागत होती. तसेच गृहकर्जाचे हप्ते वेळेवर भरल्यामुळे नाहक भूर्दंड भरावा लागतो. म्हणूनच यासर्वांनी नॉन - प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. आपल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळवण्यासाठी सर्व - प्लॅनमधील शिक्षक - शिक्षकेतर एकवटले होते

यापूर्वी योजना आणि योजना बाहय खर्च अशी विभागणी असल्याने अर्थसंकल्पात शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या पगाराची संपूर्ण वर्षभराची तरतूद केली जाते. परंतु काही पदे नियोजित खर्चात असल्याने त्यांच्या पगारावर होणाऱ्या खर्चाचे नियोजन दर तिमाही खर्चाद्वारे केले जाते. हा सर्व खर्च योजनाबाहय असल्याने एकाच शाळेतील समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काहींचे पगार नियमित होतात, तर काहींना त्याच पगारासाठी दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. शासनाद्वारे पंचवार्षिक योजने अंतर्गत प्लॅनमधील खर्चाला नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करून वाढीव खर्चाची तरतूद अर्थसंकल्पिय खर्चात केली जात होती. त्यामुळे प्लॅनमधून नॉन प्लॅनमध्ये जाण्यासाठी वाट पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु यावेळी  वर्षे उलटून गेली तरी प्लॅनमधील शिक्षक-शिक्षकेतरांना नॉन - प्लॅनमध्ये समाविष्ट केल्याने सर्व कर्मचारी संघटनांना आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले.

२०१० पूर्वी मुंबईसह संपूर्ण राज्यात शिक्षक शिक्षकेतरांचे पगार जिल्हा बँकेमार्फत व्हायचे. शासनाकडून पगाराचे पैसे येऊनही प्रत्यक्षात हातात पगार येईपर्यंत १५-२० दिवस होऊन जायचे तर कधी महिनाही लागयचा. फेब्रुवारी, मार्चचा पगार तर कधीही वेळेवर होत नव्हता. शिक्षक भारती संघटनेने शिक्षकांचा पगार तारखेला राष्ट्रीयकृत बँकेतून झालाच पाहिजे या घोषणेने मुंबई शिक्षक मतदारसंघातून २००६ साली आमदार कपिल पाटील यांना निवडून दिले. निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच अधिवेशनात शिक्षकांचा पगार तारखेला कधी होणार? असा सवाल त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या तावडीतून शिक्षक - शिक्षकेतरांचा पगार सोडवून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत सुरु करण्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीला चार वर्षे पाठपुरावा करावा लागला. म्हणूनच आज मुंबईतील शिक्षकांना चुकता तारखेला पगार होतो. तेही राष्ट्रीयकृत बँकतूनच !

आता प्रश्न होता प्लॅनमधील शिक्षक - शिक्षकेतरांच्या पगाराचा. त्यावेळी हा प्रश्न तितका ज्वलंत नव्हता. कारण प्लॅनमधील शिक्षकांची संख्याही कमी होती आणि कालांतराने नैसर्गिक न्यायाने नॉन - प्लॅनमध्ये जाण्याची हमी होती. परंतु संख्या वाढत गेल्याने शिक्षक - शिक्षकेतरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता

मुंबईसह राज्यात दरम्यानच्या काळात अनेक शाळा तुकडया अनुदानावर आल्या. दक्षिण मुुंबईत विस्थापनाने अनुदानित शाळा बंद पडत होत्या. उपनगरात लोकवस्ती वाढल्याने अनेक नव्या शाळा, तुकडया सुरु झाल्या. एकाच शाळेत अनुदानित विनाअनुदानित तुकडी होती. आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षक भारतीने दक्षिण मुंबईत बंद पडलेल्या तुकडयांचे समायोजन मुंबई उपनगरातील वाढीव तुकडयावर करण्याची मागणी केली. शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला. वाढीव तुकडीवर काम करणाऱ्या शिक्षक - शिक्षकेतरांना त्याचा लाभ व्हावा यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढण्यास भाग पाडले. त्यामुळे आठ - दहा वर्षे विनापगार काम करणाऱ्या शेकडो शिक्षक - शिक्षकेतरांना त्याचा फायदा झाला. पगार सुरु झाला. पण तो प्लॅनचा

नव्याने अनुदानावर आलेल्या आणि वाढीव तुकडीला अनुदान मिळालेल्या शाळांमधील शिक्षक - शिक्षकेतराची आणि पूर्वीच्या प्लॅनमधील शिक्षक - शिक्षकेतरांची संख्या मिळून आज सुमारे २१००० कर्मचारी  प्लॅनमधील घोळात अडकले आहेत. त्याला जबाबदार आहे शिक्षण विभागाचा नाकर्तेपणा ! आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने प्लॅनमधील कर्मचाऱ्यांचे नॉन प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करणारी अनेक पत्रे यापूर्वीच शिक्षण विभागाला दिली आहेत. आझाद मैदानापासून ते शिक्षण उपसंचालक कार्यालयावर अनेक आंदोलने झाली आहेत. त्यासाठी अशोक बेलसरे सर, प्रकाश शेळके, ठाकरे दाम्पत्य आणि सर्वच कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत विसरता येणार नाही.  

वित्त विभाग मान्यता देत नसल्याचे कारण मागील वर्षी देण्यात आले होते. पण हे सर्व साफ खोटे. वित्त विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव श्रीवास्तव यांनी शिक्षण विभागाने याबाबतचा प्रस्तावच पाठवला नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यावेळी बेलसरे सर, जालिंदर सरोदे, प्रकाश शेळके आणि मी स्वतः हजर होतो. आमदार कपिल पाटील यांनी हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी वित्त विभागाकडेच पाठपुरावा सुरु केला. म्हणून आज इथपर्यंत पोचता आलं. 


व्हॉट्स ऍप आणि फेसबुकवर कामाला असणारे, वर्तमान पत्रातून बोरू चालवणारे नेते आता श्रेय लाटण्यासाठी कदाचित पुढे येतील. पण त्यापूर्वीच शिक्षक भारतीने सर्व शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार अनिर्वाय खर्चात समाविष्ट करण्यात यश मिळवले आहे. आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाकडून नियमित अनिर्वाय खर्चाचे प्रस्ताव जाणे आवश्यक आहे.  हे प्रस्ताव वेळेत गेले तर कोणत्याही कर्मचाऱ्याला पगारासाठी वाट पहावी लागणार नाही.  


- सुभाष मोरेप्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र
subhashmore2009@gmail.com

Saturday, 21 January 2017

कॅशलेस हेल्थ कधी होणार?



शिक्षकांसाठी कॅशलेस कुटुंब आरोग्य योजना सुरू करण्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे. आमदार कपिल पाटील, श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत यांनी केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान मा. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मार्चपासून योजना सुरू करण्याचे आश्वासन विधान परिषदेत दिले. शिक्षक भारतीने सादर केलेल्या या योजनेला अन्य काही संघटनांनी केवळ श्रेयापोटी विरोध केला होता. म्हणूनच तर लक्षवेधी सूचनेच्या मूळ उत्तरात शिक्षणमंत्र्यांनी विमा योजनेचा उल्लेख केला होता. भाजप प्रणित शिक्षक परिषदेने आणि त्यांच्या आमदारांनी कॅशलेसऐवजी विमाछत्र योजनेची मागणी केली होती. परंतु सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान आमदार कपिल पाटील आणि सावंत, देशपांडे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या लेखी उत्तराला जोरदार विरोध केला. शिक्षक-शिक्षकेतरांना वार्षिक विम्याची रक्कम भरायला लावणारी विमाछत्र योजना नको असा आग्रह त्यांनी धरला. राज्यातील पोलिसांसाठी सुरू असलेल्या योजनेप्रमाणेच शिक्षकांनाही कॅशलेस योजना देण्याचे शेवटी शिक्षणमंत्र्यांनी मान्य केले.

काँग्रेसचे सरकार असताना एका महिला शिक्षिकेचा दुर्धर आजाराने मृत्यू  झाला होता. उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च झाला होता. परंतु, त्यांचे पती पोलीस सेवेत असल्याने झालेल्या खर्चाचा एक रुपयाही खिशातून द्यावा लागला नाही. दुर्दैवाने त्या शिक्षिका वाचल्या नाहीत. त्यांच्या पतीने शिक्षकांसाठी आमच्याप्रमाणे कॅशलेस योजना सुरु करा, अशी सूचना शिक्षक भारतीच्या कार्यालयात येऊन आमदार कपिल पाटील यांना केलीआम्हाला त्यातून एक नवी दिशा मिळाली.

शिक्षक-शिक्षकेतरांना वैद्यकीय बिलाच्या प्रतिपूर्तीची रक्कम मिळविण्यासाठी शिक्षण विभागापासून ते मंत्रालयापर्यंत खेपा घालाव्या लागतात. एका हार्ट अटॅकचे बिल मिळेपर्यंत दुसरा अटॅक येतो की काय अशी स्थिती निर्माण होते. मधल्या दलालांना टक्केवारी द्यावी लागते आणि एवढे करून संपूर्ण बिलाची रक्कम मिळण्याची शाश्वती देता येत नाही. म्हणूनच आमदार कपिल पाटील यांनी बेलसरे सरांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली. त्या समितीत कार्यवाह जालिंदर सरोदे आणि प्रमुख कार्यवाह सुभाष मोरे असे आम्ही तिघे होतो. पोलिसांच्या धर्तीवर शिक्षकांसाठी कॅशलेस योजना तयार करण्याचे आम्ही ठरवले. पोलिसांची योजना कशी कार्यरत आहे याचा सखोल अभ्यास केला. पोलिसांची योजना राबविणाऱ्या डॉक्टरांच्या टीमची भेट घेतली. सद्य:स्थितीत वैद्यकीय बिलाच्या परिपूर्तीच्या संदर्भात उपलब्ध शासन निर्णय आणि आरोग्य विभागाची आजारांवरील उपचारांच्या खर्चाची नियमावली यांचा परिपूर्ण अभ्यास करून 'सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना' तयार केली.

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे सर आणि आमदार कपिल पाटील यांच्या सोबत आम्ही तत्कालि शिक्षणमंत्री मा. राजेंद्र दर्डासाहेब यांना ही योजना सादर केली. सदर योजनेची कार्यप्रणाली आणि वैशिष्ट्ये पाहून मा. दर्डा साहेबांनी सदर योजनेला तात्काळ  मंजूरी दिली. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य होते की, यात शासनाचे पैसे जवळपास ३०% ने वाचणार आहेत. तसेच याचा जास्तीत जास्त शिक्षकांना लाभ मिळणार आहे. या कॅशलेस योजने अंतर्गत शिक्षकांना एक स्मार्ट कार्ड देण्यात येईल. शिक्षकाचे आई, वडील, पत्नी आणि मुले यांना शासनाने ठरवलेल्या किमान ४० पेक्षा अधिक बेड असणाऱ्या अद्ययावत, मोठ्या हॉस्पिटलमध्ये (खाजगी सुद्धा) विना खर्च वैद्यकिय मदत उपलब्ध होईल. कर्मचाऱ्याला केवळ ऍडमिट होताना स्मार्ट कार्ड स्वाईप करावे लागेल. पुढची सर्व प्रक्रिया हॉस्पिटलमार्फत होईल. झालेल्या खर्चाचे बिल हॉस्पिटल शासनाला सादर करेल आणि शासन त्यांना परस्पर बिल देईल. शिक्षक - शिक्षकेतरांना कुठेही एक रुपया द्यावा लागणार नाही, अशी ही 'सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना' राज्यातील सात लाख शिक्षक-शिक्षकेतरांना वरदान ठरणार आहे. या योजनेला आम्ही सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या आद्य शिक्षकांचं नाव देण्याची सूचना केली आहे. सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीत अहोरात्र आरोग्य सेवा केली होती. त्यातच त्यांना आजाराची लागण होऊन, त्यांचा मृत्यू झाला
शिक्षणमंत्री दर्डा साहेबांना सर्वप्रथम योजना सादर करताना.
 
तावडे साहेब शिक्षणमंत्री झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यात आम्ही त्यांना योजना सादर केली.



शासन बदलले आणि शिक्षक कॅशलेस योजनेचा नव्याने प्रवास सुरू झाला. नवे शिक्षणमंत्री मा. विनोद तावडे साहेबांपुढे पुन्हा एकदा योजना सादर केली. ही योजना त्यांनाही आवडली व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. योजनेची फाईल आरोग्य खात्याकडून पुन्हा शिक्षण विभागाकडे मंजूर होऊन आली होती. परंतु माशी कुठे शिंकली तेच कळले नाही. शिक्षक परिषदेच्या कोकणातील आमदारांनी कॅशलेस नको, विमाछत्र योजना हवी अशी मागणी केली. या विमा छत्र योजनेअंतर्गत शिक्षक-शिक्षकेतरांना दरवर्षी प्रिमियम पोटी निश्चित रक्कम भरावी लागणार आहे. मंत्रालयात शिक्षण अवर सचिव, राजेंद्र पवार यांच्याकडे विमा छत्र योजना राबवण्यासाठी विमा कंपन्यांच्या बैठका घेण्यात आल्या, अशी माहिती आम्हाला मिळाली. केवळ शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील यांना श्रेय जाईल या भीतीने राज्यातील लाखो शिक्षक-शिक्षकेतरांना उपयोगी ठरणारी एक चांगली योजना गुंडाळण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. आम्ही ताबडतोब आक्षेप घेतला. शिक्षक भारतीने मुंबईत अशोक बेलसरे आणि नागपूरात राजेंद्र झाडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन सुरु केले. विमा छत्र नको, कॅशलेस योजना हवी अशी मागणी लावून धरली होती. 

हा पहा पुरावा. शिक्षक भारतीची योजना अंमलात येते आहे असे लक्षात येताच त्याला खो देण्यासाठी mediclaim मागण्यात आला. सरकारवर वित्तीय भार न टाकता शिक्षकांनाच भुर्दंड देणारी मागणी भाजपच्या शिक्षक आमदारांनी केली. तावडे साहेबांनी त्यांचे कौतुक केले. त्याचा हा पुरावा.
 
 

५ सप्टेंबर २०१५च्या शिक्षकदिनी. मा. शिक्षणमंत्र्यांनी कॅशलेस शिक्षक कुटुंब योजनेची घोषणा पुरस्कार समारंभात स्वत: केली. त्यालाही आता वर्ष होऊन गेले आहे

शेवटी २०१६ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे चर्चा घडवावी लागली. त्याला उत्तर देताना सदर योजना मार्च २०१७ पासून लागू करण्याचे आश्वासन मा. शिक्षणमंत्र्यांनी दिले आहे. परंतु २०% अनुदानाच्या निर्णयाप्रमाणे हेही केवळ एक आश्वासन होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नवीन शासन आल्यापासून शिक्षणमंत्र्यांनी दिलेले एकही आश्वासन आजतागायत पाळलेले नाही. शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत, शिक्षकसेवकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, रात्रशाळा बंद पडणार नाहीत, सर्वांना अनुदान देणार अशा एक ना अनेक घोषणा हवेतच विरून गेल्या आहेत. शिक्षक भारतीने सादर केलेल्या योजनेमध्ये एकही रुपया खर्च न करता वैद्यकिय मदत देण्याबाबतची शिक्षक भारतीची 'सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना' ही योजना कोणत्याही बदलाशिवाय मान्य होईल अशी अपेक्षा, आम्ही करावी काय?

अशोक बेलसरे 1 आणि राजेंद्र झाडे 1 विधान परिषदेत जातील तेव्हा सरकारला करावंच लागेल

शिक्षक भारतीने सादर केलेली 'सावित्री-फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना' नेमकी आहे कशी? हे वाचण्यासाठी क्लीक करा 
- https://goo.gl/Q7VSdw
 


- सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य.

subhashmore2009@gmail.com