Sunday 30 August 2020

समान काम समान वेतन


केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्यानुसार प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला किमान अठरा हजार रुपये वेतन मिळणे त्याचा अधिकार आहे. कायमस्वरूपी अथवा कंत्राटी कामगारालाही किमान वेतन मिळण्याचा हक्क आहे. कायदा करण्यासाठी जेवढा संघर्ष करावा लागतो तेवढा किंबहुना त्यापेक्षा जास्त संघर्ष कायद्याच्या अंमलबजावणीसाठी करावा लागतो. केंद्र सरकारने किमान वेतनाचा कायदा केला असला तरी राज्यातील कंत्राटी कामगारांना, अंगणवाडी सेविकांना तसेच विविध स्तरावर काम करणाऱ्या कामगारांना अद्यापि किमान वेतनापेक्षा कमी मानधनावर काम करावे लागत आहे. हे अन्यायकारक आहे. 

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात नवनियुक्त शिक्षकांना अत्यल्प अपमानजनक मानधनावर काम करावे लागत आहे ही शासनासाठी शरमेची बाब आहे. डी. एड, बी.एड पूर्ण करायचे, प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हायचे,  अभियोग्यता चाचणी पार करायची आणि हे सर्व करून नोकरी मिळाली तर मानधन मिळत केवळ सहा हजार.  स्वतःचे राहणीमान चांगले ठेवून दर्जेदार शिक्षण देण्याची कसरत गेली वीस वर्ष शिक्षण क्षेत्रात नवनियुक्त शिक्षक करत आहेत. शिक्षक भारती व आमदार कपिल पाटील यांनी पहिल्यापासून शिक्षण सेवक योजना हा कलंक आहे, तो समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे.
 
सेवक नाही, शिक्षक आम्ही
न सहणार अपमान
अज्ञानाचे भेदक आम्ही
पुन्हा मिळवू सन्मान

अशी घोषणा आमदार कपिल पाटील यांनी  दिलेली आहे.

समान काम समान वेतन या न्यायानुसार एकाच स्टाफरूममध्ये बसून समान काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षण सेवक संबोधणे आणि तुटपुंज्या मानधनावर काम करायला लावून त्यांचे आर्थिक शोषण करणे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अहितकारक आहे.

हे शिक्षणसेवक धोरण कोठून आले?

केंद्रात एनडीएचे सरकार असताना मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना एक पत्र देऊन शिक्षक - शिक्षकेतर यांच्या वेतनावर होणारा खर्च कमी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. कायमस्वरूपी शिक्षक  नेमन्या एवजी कंत्राटी स्वरूपात कर्मचारी नेमण्याचे सुचवले होते. यासाठी त्यांनी भाजपशासित राज्यांचा दाखला दिलेला होता. गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांनी अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या असून अल्प मानधनावर शिक्षक  उपलब्ध होत असल्याचे लक्षात आणून दिले. मध्यप्रदेश शासनाने शिक्षण हमी योजना, राजस्थानने शिक्षाकर्मी योजना आणि गुजरात मध्ये विद्या सहाय्यक योजना या नावाने सुरू असलेल्या योजनांचा हवाला देत महाराष्ट्र सरकारने 10 मार्च 2000 रोजी प्राथमिक शिक्षकांसाठी 27 एप्रिल 2000 मध्ये माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांसाठी शिक्षण सेवक योजना जाहीर केली. या शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे मानधन दिले जात होते. 

1. माध्यमिक शाळा 
(5 वी ते 7 वी )
 2500  रुपये

2. माध्यमिक शाळा
(8 वी ते 10 वी)
 3000  रुपये

3. अध्यापक विद्यालय 3000  रुपये

4. कनिष्ठ महाविद्यालय 3500 रुपये
  
शिक्षणसेवक योजनेच्या विरोधात  राज्यभर ज्या ताकतीने आंदोलन उभे राहायला हवे होते त्या प्रमाणात विरोध झाला नाही.  नवीन नियुक्त कर्मचारी संख्या कमी असल्याने विरोध कमी पडला. त्यात काही कर्मचारी कोर्टात गेले. वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या. माननीय हायकोर्टाने दिलेल्या निकालानुसार शासनाला केवळ योजनेद्वारे अशाप्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही असे निरीक्षण नोंदवले. तसेच शिक्षण सेवक योजनेत अनेक सुधारणा सुचविल्या. शासनाने माननीय हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा विपर्यास करून सदर योजनेचे 13 ऑक्टोबर 2000 रोजी कायद्यात रूपांतर केले.

वर्षानुवर्ष गुरूला आदराचे स्थान देणाऱ्या समाजात शासनाने शिक्षकांना सेवकांचा दर्जा दिला. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा कायदा म्हणावा लागेल. 13 ऑक्टोबर 2000 शासन निर्णयामध्ये माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय विद्यालयातील शिक्षकांचे मानधन खालीलप्रमाणे ठरवण्यात आले
1. माध्यमिक शाळा
(5 वी ते 7 वी )
 3000  रुपये

2. माध्यमिक शाळा
(8 वी ते 10 वी )
 4000  रुपये

3. अध्यापक विद्यालय 4000  रुपये

4. कनिष्ठ महाविद्यालय 5000 रुपये
 
शिक्षण सेवक कायदा लागू झाला तेव्हा  प्रशिक्षित शिक्षण सेवकांना आणि नियमित वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांच्या पगारामध्ये फारशी तफावत नव्हती.  राज्यातील विविध संघटना आणि लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी मागणी केल्यामुळे 17 मार्च 2012 मध्ये मानधन वाढ करण्यात आलेली आहे. आठ वर्षे होऊन गेली आहेत.  आज नियमित वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळत आहे तर शिक्षण सेवकांना मात्र केवळ सहा हजार रुपये इतक्या मानधनावर काम करावे लागत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर जाणाऱ्या कामगाराला ही शिक्षण सेवकापेक्षा ज्यादा मानधन मिळते. सहा हजार रुपये मानधनामध्ये ग्रामीण भागातही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अशक्य आहे.

मुंबई - पुण्यासारख्या शहरात हे नवनियुक्त शिक्षक बांधव सहा हजार रुपयात कसे चालवत असतील याचा शासनाने कधी विचार केला आहे का?

सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कसे झाले ?

2010 मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण सेवकांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या शोषणावर अशासकीय विधेयक सादर केले. शासकीय सेवेत कुणालाही सेवक म्हणून ठेवण्यात येत नाही केवळ शिक्षणक्षेत्रावरच अन्याय  का? असा प्रश्न त्यांनी या विधेयकाद्वारे शासनाला केला. शिक्षकांना सेवक म्हणणे, समान काम करीत असतानाही त्यांना तुटपुंजे मानधन देणे आणि त्यांचा तीन वर्षे  कालावधी करणे याला अशासकीय विधेयकातुन विरोध केला. शिक्षण सेवकांना सेवक न म्हणता सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन म्हणावे, त्यांना मानधन न देता वेतन श्रेणी द्यावी आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. सत्ताधाऱ्यांनी कपिल पाटलांना अशासकीय विधेयक मागे घेण्याची विनंती केली. परंतु कपिल पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम राहिले. सभागृहात सत्ताधाऱ्यांची संख्या कमी होती. तत्कालीन शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना सभागृहात परत येण्यास भाग पाडले. कपिल  पाटील यांनी मतदानाची मागणी केली. यावर सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली. अखेर सभापतींनी विशेषाधिकाराचा वापर करत नियम (41) 1 अन्वये अशासकिय विधेयक नामंजूर झाल्याचा निर्णय दिला आणि सरकारचा जीव भांड्यात पडला. त्यादिवशी आमदार कपिल पाटील सभागृहात एकटेच पडले अन्यथा आपल्या सर्वांना सन्मान मिळालाच असता. मात्र कपिल पाटील यांच्या विधेयकाची दखल घेत तत्कालीन शिक्षणमंत्री दर्डा यांनी मानधनवाढीचा आणि अपमानास्पद नाव बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याची घोषणा सभागृहात केली. पुढे थोडंफार मानधन वाढलं आणि कपिल पाटील यांनी सुचवल्याप्रमाणे सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन असं नावंही बदललं गेलं.

समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे

सातव्या वेतन आयोगासाठी नियुक्त केलेल्या बक्षी कमिटीने खंड एक मधील प्रकरण-2 मध्ये मुद्दा क्रमांक 1 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केल्या प्रमाणे किमान वेतन अठरा हजार रुपये देण्याचे सुचवले आहे. महाराष्ट्र सरकारने ज्या  गुजरात शासनाच्या विद्या सहाय्यक योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक योजना सुरू केली त्या गुजरात सरकारने दिनांक 1 फेब्रुवारी 2017 पासून विद्या सहायकांना सुधारित 19 हजार 950 एवढी मानधन वाढ दिली आहे. या तुलनेत महाराष्ट्रातील सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन यांना केवळ सहा हजार रुपये मानधनावर काम करायला लावणे अन्याय कारक आहे.

तसेच माननीय उच्च न्यायालय जोधपुर, राजस्थान यांच्या दिनांक 29 जानेवारी 2020 च्या आदेशाप्रमाणे सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास अल्प मानधनावर राबवणे म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 14, 16, 21, 23 आणि 38 चे उल्लंघन करणारे आहे असा निर्णय दिलेला आहे. परिविक्षाधीन कर्मचाऱ्यास त्याच्या परिविक्षाधीन कालावधीत नियमित व पूर्ण  वेतन देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.  किमान वेतन कायद्यानुसार कंत्राटी कामगारांनाही 18 हजार रुपयापर्यंत मानधन दिले जात आहे. राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ही ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाच्या काळातही ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू केलेली आहे.

वरील सर्व बाबींचा विचार केल्यास सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन किमान 18000 वेतनासाठी पात्र आहेत. परंतु ते न देणे म्हणजे आर्थिक शोषण होय. महाराष्ट्रासारख्या शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्यात समान काम समान वेतन कायद्यानुसार सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी लागू केली पाहिजे. एवढेच नव्हे तर परिविक्षाधीन कालावधी तीन वर्षापेक्षा कमी केला पाहिजे अशी आमदार  कपिल पाटील आणि शिक्षक भारती ची भूमिका आहे. 

पवित्र पोर्टल द्वारे नवनियुक्त 6000 सहाय्यक शिक्षकांनी  आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्व मान्य करून शिक्षक भारती सोबत लढ्यात सामील होण्याचे ठरवले आहे. गणेश सावंत, प्राजक्ता गोडसे, हरीश शिंदे, सुधीर पाटील, भरत सोनवणे, किरण पवार, जितेंद्र लोकरे, सचिन हेरोलीकर, जयवंत कुंभार, ऋषी गोटे, विपुल गागरे, राम जाधव, सतीश पाटील, उमेश पवार, अस्मिता रोकडे, संदेश कांबळे, अश्विनी माने, संभाजी बेस्के, संभाजी तोडकर आणि हजारो नवनियुक्त शिक्षकांनी एकत्र येऊन गरज पडली तर मोठा संघर्ष करण्याचा निर्धार केला आहे. नियमित वेतनश्रेणी लागू झालीच पाहिजे आणि परिविक्षाधीन कालावधी कमी केला पाहिजे या दोन मागण्या घेऊन शिक्षक भारती आणि आमदार कपिल पाटील माननीय शिक्षणमंत्री मा. वर्षाताई गायकवाड, ग्राम विकासमंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब आणि अर्थमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्यासोबत बैठका घेऊन परिस्थिती लक्षात आणून देणार आहेत.

मला विश्वास आहे आपल्या या सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन बांधवांना न्याय मिळेलच.
लढूया!! जिंकूया!!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


Monday 24 August 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळणार कधी?


मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी पाच समान हप्त्यात पीएफ खात्यावर जमा होणार होती परंतु शासनाने कोरोना महामारीचे कारण देवून पहिला हप्ता दिलेला नाही. पीएफ खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी इन्कमटॅक्स भरला आहे. आपली अवस्था तेलही गेले अन तुपही गेले... अशी झाली आहे. 

बक्षी कमिटीने सादर केलेल्या खंड 1 मधील प्रकरण 5 मध्ये सुधारित आश्वासित प्रगती योजनेबद्दल माहिती दिली आहे. नवीन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत स्थापन केलेल्या अभ्यास गटाचा अहवाल प्रलंबित आहे. बारा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणारी निवड श्रेणीचे लाभ शिक्षकांना मिळत नाहीत. राज्यभर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे हजारो प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आलेले आहे.

कर्मचाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत पदोन्नती मिळत नाही. निदान वेतनाच्या बाबतीत वेतनाचे लाभ मिळावे या अपेक्षेने कालबद्ध पदोन्नती दिली जाते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विनाअट वेतन वाढ मिळते. परंतु शिक्षण विभागाने नेहमी शिक्षकांवर अन्याय केलेला आहे. वरिष्ठ / निवड श्रेणी देताना प्रशिक्षणाची अट ठेवण्यात आलेली आहे. सेवेची बारा वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिल्यावर वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते. तसेच निवड श्रेणी लागू होण्यासाठी चोवीस वर्षे पूर्ण झाल्यावर प्रशिक्षण करावे लागते. निवड श्रेणी सरसकट दिली जात नाही. मंजूर पदाच्या केवळ 20 टक्के पदांनाच निवड श्रेणी लागू होते. त्यामुळे अनेक शिक्षक बांधव निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित राहतात. तसेच विज्ञान शाखेतील पदवीधर शिक्षकांना सुट्टी घेऊन पदव्युतर पदवी घेणे शक्य नाही. राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे शिक्षकांना ही विनाअट वेतनश्रेणीचा लाभ झाला पाहिजे, यासाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आपण लढत आहोत.

मागील काही वर्षांपासून प्रशिक्षण होत नाही. प्रशिक्षण न झाल्यामुळे वरिष्ठ / निवड वेतनश्रेणी च्या प्रस्तावावर कार्यवाही होत नाही. शिक्षक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर हमीपत्रावर वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ द्यायला सुरुवात केली होती. परंतु मागील शासनाने 23 ऑक्टोबर 2017 चा अन्यायकारक शासन निर्णय काढून जाणीवपूर्वक शिक्षकांना वेतनश्रेणीच्या लाभांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. शाळासिद्धिमध्ये शाळेला 'ए' ग्रेड असणे आणि 9वी / 10वी चा निकाल 80% पेक्षा जास्त असणे अश जाचक अटी घालण्यात आल्या. मोठया संघर्षाने 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार वरील जी.आर. अधिकरमित करण्यात आला आहे. पण अंमलबजावणी होत नाही.

शिक्षक भारतीने माननीय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी मिळण्याबाबत खालील मागण्या केलेल्या आहेत

1) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नवीन लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना शाळेतील सर्व शिक्षकांना  विनाअट लागू करा.

2) नवीन आश्वासित प्रगती योजना लागू होईपर्यंत वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करताना मागील दोन वर्षांचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन पात्र शिक्षकांना वरीष्ठ/निवड श्रेणी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश देण्यात यावेत.

3) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये दिनांक ऑक्टोबर 2017 व दिनांक 21 डिसेंबर 2018 चे शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आले आहेत.  26 ऑगस्ट 2019 चा शासन निर्णय स्वयंस्पष्ट असूनही अंमलबजावणी न करणाऱ्या शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

4) 26 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी करता पात्र शिक्षकांना  प्रशिक्षण करण्याची आवश्यकता नाही. असे असूनही प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवणे अन्यायकारक आहे.  कृपया याबाबत राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व लेखाधिकारी यांना आदेश  द्यावेत.

शिक्षक भारतीच्या आणि आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन लाभांची आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करण्यासाठी आपण प्रयत्न करूया! लढूया !! जिंकूया !!!

आपला स्नेहांकित 
सुभाष किसन मोरे 
कार्याध्यक्ष 
शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य

Friday 14 August 2020

विशेष शाळांना न्याय मिळेल का?


सामाजिक न्याय विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे विशेष शाळातील कर्मचारी पाच महिने पगाराशिवाय जगत आहेत. मुंबईसारख्या शहरात पगाराशिवाय विशेष शाळा/ कर्मशाळेतील  मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. गृहकर्जाचे हफ्ते थकल्यामुळे बँकांना व्याजावर व्याज द्यावे लागत आहे. विजबिल, घरभाडे, किराणा सामान इत्यादी दैनंदिन खर्च भागविण्यासाठी उसनवारी करावी लागत आहे. सामाजिक न्याय विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हजारो कर्मचाऱ्यांवर कोरोना काळात उपासमारीची वेळ आली आहे. पगार हा प्रत्येक काम करणाऱ्या  व्यक्तीचा सन्मान असतो. पगार वेळेवर मिळणे हा त्याचा अधिकार आहे. परंतु सामाजिक न्याय मंत्रालय ज्याच्या नावात न्याय आहे तो न्याय कर्मचाऱ्यांना कधीच मिळत नाही. दिसतही नाही. वर्षानुवर्षे पगार उशिरा होत आहेत. कधी अधिकारी सही करत नाही म्हणून तर कधी पैसे नसतात म्हणून. पण याची शिक्षा शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना मिळते. कर्मचाऱ्यांनी शाळांमध्ये काम करायचं की रोज उठून पगारासाठी एखाद्या याचका प्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या दारात हेलपाटे मारायचे. एवढी अहवेलना का?

कोरोना काळात कोरोनाबरोबर अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाने कहर केला आहे. पाच महिने पगारच नाही. आठ दिवसात पगार होईल असे उत्तर गेली पाच महिने ते देत आहेत. पण आजही पगार आलेला नाही. राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन एक वर्ष उलटून गेले तरी विशेष शाळा/ कर्मशाळा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. याला जबाबदार कोण?

पगार/ वेतन आयोग रखडण्याचे कारण काय?

सामाजिक न्याय विभागाने अखर्चिक राहिलेले 480 कोटी रूपये मार्च महिन्या अखेर वित्त विभागाला परत पाठविले नाहीत. समाज कल्याण आयुक्त तसेच क्षेत्रीय अधिकारी यांनी शासनाला अखर्चिक रककम परत करणे बंधनकारक आहे. पण रक्कम परत न गेल्याने पगाराला उशिरा झाला आहे. पण त्यालाही दोन महिने उलटून गेले आहेत सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी  वित्त विभागाकडे बोट दाखवतात तर वित्त विभागाचे अधिकारी सामाजिक न्याय विभागाकडे बोट दाखवतात. प्रश्न मात्र सुटत नाही. आमदार कपिल पाटील यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेऊन वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. त्यांनीही आठ दिवसात पगार मिळणार असे आश्वासन दिले. त्यालाही पंधरा दिवस उलटून गेले आहेत. कोरोनामुळे आपण बाहेर पडू शकत नाही. रस्त्यावर उतरून आपल्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू शकत नाही. म्हणून अखेर आपण "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे.

सातवा वेतन आयोग मिळण्यास उशीर होत आहे याचे कारणही सामाजिक न्याय विभागातील अधिकारीच आहेत. सातव्या वेतन आयोगाची फाईल वित्त विभागाकडे पाठवताना योग्य कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे त्या फाईल मध्ये अनेक त्रुटी निघाल्या. या त्रुटी तातडीने दूर करणे आवश्यक होते. शिक्षक भारती पदाधिकाऱ्यांनी स्वतः सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर एक बाब लक्षात आली की विशेष शाळा कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी बाबत आवश्यक ती कागदपत्रे  सामाजिक न्याय विभागाकडे नाहीत. शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे, वेतनाबाबतच्या नोंदी, अधिसूचना इ. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात जमा केलेल्या आहेत. तरीसुद्धा आजही आपली सातव्या वेतन आयोगाची फाईल सरकलेली नाही. कोरोनाचं कारण पुढे करून दप्तर दिरंगाई सुरू आहे. म्हणूनच आपल्याला या इमेल भेजो आंदोलनातून शासनाला जागे करायचे आहे. राज्यभरातून हजारो मेल पाठवायचे आहे

दिव्यांगांच्या शाळेतील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न

1.  संस्थाचालक, मुख्याध्यापकांना  लायसन्स नूतनीकरणासाठी, वाढीव विद्यार्थी मान्यतेसाठी हेलपाटे मारावे लागतात.

2.  सामाजिक न्याय विभाग कार्यालयाने नुकत्यात 176 शाळांच्या  नूतनीकरणाच्या प्रस्तावाला नामंजूर केलेले आहे.  संस्थाचालक, मुख्याध्यापकांना वेठीस धरून विशेष शाळा/ कर्मशाळा बंद करण्याचे धोरण राबविले जात आहे.

3. सामाजिक न्याय विभागातील  अधिकाऱ्यांची कामाबद्दल असलेली अनास्था यामुळे शिक्षक-शिक्षकेतर यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

4.  नियमित वेतन वाढ, पदोन्नती, नियुक्ती इत्यादी कामांसाठी शिक्षक-शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते.

5. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅज्युएटी, पेन्शनसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात,

6. ऑनलाईन सेवार्थ प्रणाली द्वारे वेतनासाठी शालार्थ आयडी वेळेत न मिळाल्यामुळे वैयक्तिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळूनही वेतन मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

7. कायम विनाअनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांना अनुदानासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.

8.  अपंग शाळा/ कर्मशाळा कर्मचारी शाळा संहिता च्या अंमलबजावणीबाबत अनेक ठिकाणी विसंगती दिसून येते. शिक्षक, शिक्षकेतरांचे कामाचे तास सर्व संस्थांमध्ये सारखे असणे आवश्यक आहे.

9.  अतिरिक्त शिक्षकांच्या ऑनलाईन समायोजना मध्ये मोठा घोटाळा  दिसून येतो. 

10. दिव्यांग मुलांना सकस पोषण आहार, क्रीडा स्पर्धांचे आयोजन,  सामायिक अभ्यासक्रम इत्यादीबाबत सामाजिक न्याय विभाग उदासीन असल्याचे चित्र दिसते.

12 ऑगस्ट 2020 पासून विशेष शाळा/कर्मशाळा  कर्मचाऱ्यांनी "ई-मेल भेजो आंदोलन" सुरू केले आहे. आमदार कपिल पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांना भेटून रखडलेला पगार व सातवा वेतन आयोग तातडीने सुरू करण्याची विनंती केली आहे. माननीय धनंजय मुंडे साहेबांनी पगार वितरित करण्याचे आदेश दिलेले आहेत.  पगार वितरीत करणेबाबत झालेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा आपले पदाधिकारी मंत्रालयात जाऊन घेतील.  आपला रखडलेला पगार होण्यासाठी मंत्रालय स्तरावर तातडीने निर्णय न झाल्यास आपण सर्वांनी रस्त्यावर  उतरण्याची तयारी ठेवूया.  सामाजिक न्याय मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेऊया. पगार झाल्याशिवाय आता आपण शांत बसायचे नाही.

लढेंगे! जितेंगे!!

आपला स्नेहांकित 

सुभाष किसन मोरे, 

कार्याध्यक्ष 

शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य


Friday 7 August 2020

अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन!

विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष आणि शिक्षक भारतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य,

पेन्शन नाकारणारी 10 जुलै 2020 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली आधिसुचना मागे घेण्याचे आश्वासन माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहे. शिक्षण मंत्र्यांचे शिक्षक भारतीच्या वतीने जाहीर आभार!

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी पेन्शन हिरावून घेणारी अधिसूचना जारी केली होती. महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील मसुद्यात बदल सुचवणारी आधिसुचना राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पेन्शन वर घाला घालणारी होती.

शिक्षक भारती या आपल्या शासन मान्यताप्राप्त संघटनेने या  अन्यायाच्या विरोधात राज्यभर जागृती निर्माण केली.  पहिल्या टप्प्यात आपण सर्वांनी मिळून पोस्टर आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणून दुसर्या टप्प्यात राज्यभरातून शिक्षक भारतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लेखी आक्षेप नोंदवण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात आपण स्थानिक मंत्री व आमदार यांना अधिसूचना रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले. आपण घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यभरातून अनेक मंत्री व आमदारांनी माननीय शिक्षण मंत्र्यांना फोनद्वारे व पत्राद्वारे अधिसूचना रद्द करण्याचे करण्याची विनंती केली.

आपल्या आंदोलनाला प्रतिसाद देत दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी माननीय शिक्षण मंत्र्यांनी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेला चर्चेसाठी बोलाविले. शिक्षक भारती संघटनेच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे,  कार्यवाह प्रकाश शेळके आणि शिक्षक भारती मुंबईचे कैलास गुजांळ उपस्थित होते. आमदार कपिल पाटील व  शिक्षक भारती ने मांडलेले सर्व मुद्दे मान्य करून अधिसूचना मागे घेण्याचे आश्वासन मा. शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले.




(बातमी मोठी करून वाचण्यासाठी click करा)


10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात  आपले आमदार कपिल पाटील व शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष आदरणीय बेलसरे सर  यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी कोरोना महामारीच्या काळातही खूप मेहनत घेतली.  निवेदने दिलीत. राज्यभर जागृती निर्माण केली. आंदोलने केली. आणि म्हणून आज आपल्याला यश मिळाले आहे. शिक्षक भारतीचे सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका  अध्यक्ष, सर्व पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते या सर्वांच्या एकजुटीने हे यश मिळालेले आहे.

त्याचबरोबर राज्यभरातील  संस्थाचालक, मुख्याध्यापक  व विविध संघटनांचे पदाधिकारी यांनीही शिक्षक भारतीच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत लेखी आक्षेप नोंदवावा मोहिमेत सहभाग घेतला. त्यांचेही आभार!

शैक्षणिक प्रश्नावर  राज्यभरातून आपण सर्वजण शिक्षक भारतीच्या माध्यमातून एकत्रितपणे जो संघर्ष केला आहे त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम !

माननीय शिक्षण मंत्री वर्षाताई  गायकवाड, आपले आमदार कपिल पाटील तसेच राज्यभरातून आपल्या निवेदनाला प्रतिसाद देऊन फोन करणारे व निवेदन देणारे माननीय मंत्री, माननीय स्थानिक आमदार यांचे शिक्षक भारतीच्या वतीने आभार!

शिक्षक भारतीच्या एकजुटीचा विजय असो !!!

आपला स्नेहांकित,

सुभाष किसन मोरे

कार्याध्यक्ष, शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य


Saturday 1 August 2020

आपली पेन्शन वाचवण्यासाठी

*मा. मंत्री व स्थानिक आमदार यांना द्यावयाच्या पत्राचा नमुना*

प्रति,
(मा. मंत्री अथवा स्थानिक आमदार)

विषय : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जारी केलेली 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करणेबाबत.

महोदय/ महोदया,
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 10 जुलै 2020 रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील सेवाशर्तीमध्ये बदल सुचवणारी ही अधिसूचना अन्यायकारक आहे. या अधिसूचनेत सुचवल्याप्रमाणे बदल झाल्यास राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त लाखो मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा जुनी पेन्शन मिळण्याचा अधिकार हिरावला जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला 2020 साली नियमावलीत बदल करून पंधरा वर्षे मागे जाऊन पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शनच्या हक्कापासून वंचित राहणार आहेत. 

कृपया शिक्षक भारतीच्या मागणीची आपण दखल घ्यावी व माननीय शिक्षणमंत्री यांना 10 जूलै  2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्यासाठी पत्र लिहावे , ही विनंती.

आपले विनित 
(जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व स्थानिक पदाधिकारी यांची नावे)

-------------------------------------------

शिक्षक भारती पदाधिकारी यांच्यासाठी सूचना -

शिक्षक भारतीने 10 जुलै 2020 रोजीच्या अन्यायकारक अधिसूचनेच्या विरोधात राज्यभर आंदोलन पुकारले आहे. राज्यभरातून अधिसूचनेवर लेखी आक्षेप घेणारी पत्र पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवण्याची मोहीम आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. 10 ऑगस्टपूर्वी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाखो लेखी आक्षेप मंत्रालयापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मा. आमदार  कपिल पाटील साहेब व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत आंदोलनाच्या पुढील टप्प्यात पुढीलप्रमाणे नियोजन ठरवण्यात आलेले आहे.
1) राज्यातील सर्व आमदारांना निवेदन देण्याची मोहीम ठरवण्यात आली आहे. रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी नियोजन करून आपापल्या मतदारसंघातील मंत्री अथवा स्थानिक आमदारांना वरील निवेदन द्यावयाचे आहे. 
2) निवेदन देताना फोटो काढायचा आहे व ते फोटो Whatsapp आणि Facebook ला शेअर करायचे आहेत.
3) निवेदन दिल्यानंतर मंत्री अथवा स्थानिक आमदार यांना मा. शिक्षणमंत्री वर्षातही गायकवाड  यांना प्रत्यक्ष फोन करायची विनंती करावयाची आहे.
4) आमदार कपिल पाटील आणि राज्य पदाधिकारी लवकरच मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, मा. शरद पवार साहेब, मा. शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि मा. संजयजी राऊत यांची भेट घेणार आहेत. अन्यायकारक अधिसूचनेबाबत माहिती देऊन ती रद्द करणेबाबत कार्यवाही करण्याची विनंती करणार आहेत. 
5) राज्याध्यक्ष श्री अशोक बेलसरे राज्यातील सर्व शिक्षक आमदार व सर्व पदवीधर आमदार यांना फोन करून 10 जुलै 2020 रोजीची अधिसूचना रद्द करण्याबाबत एकत्र येवून पाठपुरावा करण्याचे आवाहन करतील. 

वेळ फार कमी आहे. गाफिल राहून चालणार नाही. आपल्या सर्वांना अधिसूचना रद्द करण्यासाठी वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करायचे आहे. आम्हाला खात्री आहे आपण ते कराल.
लड़ेंगे ! जीतेंगे !!

आपले स्नेहांकित,

अशोक बेलसरे, अध्यक्ष
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष
संजय वेतुरेकर, जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह
प्रकाश शेळके, कार्यवाह
संगिता पाटील, महिला अध्यक्ष
आर. बी. पाटील, ज्युनिअर कॉलेज अध्यक्ष
धनाजी पाटील उपाध्यक्ष 
कल्पना शेंडे, मुंबई अध्यक्षा